नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोडमध्ये कृषी जागर

Update: 2022-12-16 09:16 GMT

वर्षानुवर्षे दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या शेतीला नवी दिशा देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून राज्यव्यापी कृषी प्रदर्शनाचे आयोजन सिल्लोड मध्ये करण्यात आले आहे

नव्या वर्षाची सुरुवात राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता असून देशाच्या अमृत महोत्सवी आणि चारही कृषी विद्यापीठांच्या सुवर्ण महोत्सवी वाटचाली निमित्त अत्याधुनिक शेती संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने हीआ अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत येत्या दिनांक 01 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव - 2023 पार पडणार आहे.

राज्यातील कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन, नवीन वाणांची निर्मिती याबरोबरच नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी असे राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्याच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने

दरवर्षी जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रथमच सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री सत्तार यांच्यासोबत कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.

यावेळी मंत्री सत्तार म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे. यामध्ये राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत.राज्यभरातील जवळपास 10 लाख शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्यांचं म्हणून साजरे होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, त्यासंबंधी होणारं संशोधन, नवीन वाणांचं संशोधन, बदलेलं वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण यावेळी महोत्सवात करण्यात येणार आहे.

या महोत्सवात कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी दालने असणार आहेत. कृषी विभागाच्या एकात्मिक दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचे सादरीकरण केले जाणार आहे. बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती देणारी दालने देखील महोत्सवात असतील. कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने यांचीही माहिती देणारी १६० पेक्षा अधिक दालने महोत्सवात असतील. शिवाय शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, यांचीही दालने असतील. शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, यामध्ये राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादनेही शेतक-यांना पाहावयास मिळतील, असे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

या महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, यासाठी कृषि विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. सत्तार यांनी दिली.

या राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सवाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी तर कृषि सहसंचालक तुकाराम मोटे यांची समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कृषी प्रदर्शनात काय असणार?

नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, चर्चासत्रे, प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी

महोत्सव काळात दहा लाखाहून अधिक शेतकरी देणार प्रदर्शनास भेट

महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे 600 स्टॉल्स.

Tags:    

Similar News