मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माझे मित्र असा करतात...
X
“मी कधी श्रेय घेतलं नाही, आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. आम्हाला फक्त लोकांचा आशिर्वाद पाहिजे. याचं श्रेय जनतेला जातं. नागपुरात सुरु असलेले प्रकल्प कधीच थांबवले जाणार नाही. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही,”
असं म्हणत आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकमान्यनगर ते बर्डी या अॅक्वामार्गावर मेट्रोच्या सेवेचे लोकापर्ण व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून केले. फक्त 20 मिनिटात 20 रुपयात नागपूरकरांना सीताबर्डी ते लोकमान्यनगर असा प्रवास या मार्गाने करता येणार आहे.
“आपण एका गाडीत बसलो नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आलो आहे. नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या तुटलेल्या युतीवर भाष्य केलं. तसंच यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘माझे मित्र’ असा केला.
महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांचा विकास करताना त्यांचा चेहरामोहरा जपला जाईल अशा पद्धतीने कामं झाली पाहिजेत. नागपूर मेट्रोला 'माझी मेट्रो' हे नाव दिल्यानं त्याविषयी नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल. नागरिकांनी देखील या सुविधांचे संवर्धन करुन तिची निगा राखावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
या दरम्यान उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचेही आभार मानले.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस पूर्ण करण्याचा काम नितीन गडकरींनी केले. ते अत्यंत अभ्यासू माणूस असून ते भाषण सुद्धा अभ्यासपूर्वक करतात.
केंद्र शासनाकडे काही विकास कामांच्या आवश्यक त्या परवानग्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या आवश्यक असून केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या सदस्यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून जनतेला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असं आवाहन करतानाच नागपूर मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.