यापुढे महाराष्ट्रात यायचं तर आमची परवानगी लागेल; योगींना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर
X
स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मजुरांमुळे राज्य सरकार विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार असा सामना रंगतोय. त्यात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. यापुढे उत्तर प्रदेशातील कामगारांना महाराष्ट्रात यायचं असेल तर राज्य सरकारची परवानगी लागेल अन्यथा येता येणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
महाराष्ट्राला उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. त्याला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. असं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं, असं राज यांनी म्हटलंय.
यासोबतच त्यांनी राज्य सरकारलाही या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची सूचना केलीय. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा. हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा, असंही राज यांनी म्हटलंय.