हिंगणी तालुक्यातील पाणंद रस्त्याची दुरवस्था; शेतकरी त्रस्त
X
वर्धा : वर्धाच्या हिंगणी तालुक्यातील शेतशिवारात जाण्यासाठी पाणंद रस्ते आहे. मात्र देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पाणंद रस्त्यांचा उपयोग होतो.
मात्र या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. या परिसरात पाणंद रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे.
पावसाळ्यात पाणंद रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे मुरूम टाकून नुतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लवकरात लवकर या पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.