Home > News Update > सावधान! ‘या’ लिंक वर क्लिक कराल तर, तुमच्यावर सायबर हल्ला होऊ शकतो...

सावधान! ‘या’ लिंक वर क्लिक कराल तर, तुमच्यावर सायबर हल्ला होऊ शकतो...

सावधान! ‘या’ लिंक वर क्लिक कराल तर, तुमच्यावर सायबर हल्ला होऊ शकतो...
X

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात 242 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाजमाध्यमावर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या 242 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 8 गुन्हे अदखलपात्र (N.C) आहेत.

यामध्ये प्रामुख्याने बीड 27, पुणे ग्रामीण 19, मुंबई 17, कोल्हापूर 16, जळगाव 14, सांगली 10, नाशिक ग्रामीण 10, जालना 9, सातारा 8, नाशिक शहर 8, नांदेड 7, परभणी 7, ठाणे शहर 6, सिंधुदुर्ग 6, नागपूर शहर 5, नवी मुंबई 5, सोलापूर ग्रामीण 5, लातूर 5, बुलढाणा 5, पुणे शहर 4, गोंदिया 4, ठाणे ग्रामीण 4, सोलापूर शहर 3, रायगड 2, हिंगोली 2, वाशिम 1,धुळे 1,यांचा समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 110 तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 82 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी 4 गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी 41 गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत 47 आरोपींना अटक केली आहे. 31 आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात (takedown) करण्यात यश आले आहे.

अमरावती शहरांतर्गत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काल एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 4 वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन सुरु असताना देखील दोन धर्मात तेढ निर्माण होऊन, परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मजकूर असणाऱ्या पोस्ट्स टाकल्या होत्या.

ऑनलाइन फसवणूक.. सावध रहा

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसॲप मेसेजेस फिरत आहेत. या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी, किंवा कोणत्याही वेबसेरीजचे सदस्य subscription स्वस्तात आहे, खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते. आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये. कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.

तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर एक फॉर्म उघडतो. ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स, पासवर्डस, डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती, पिन क्रमांक सर्व विचारले जाते. तुम्ही ही सर्व माहिती दिली की, एक ओटीपी येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो. पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो ओटीपी, तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा एसएमएस येतो की तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये. तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) पण नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Updated : 21 April 2020 3:32 AM GMT
Next Story
Share it
Top