Coronavirus- एअर इंडियाला लॉकडाऊन वाढण्याची भीती?
X
२१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्यात येईल अशी आशा देशाला असताना सरकारी मालकीच्या एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयामुळे मात्र संभ्रम वाढला हे. कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केले आहे.
१४ नंतर लॉकडाऊन जाहीर सुरू ठेवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं कॅबिनेट सचिवांनी काही दिवसांपूर्वी म्हंटलं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण सरकारी मालकीच्या एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत तिकीट बुकिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “१४ एप्रिलनंतर सरकार काय निर्णय़ घेतं त्याकडे आमचे लक्ष आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांचं बुकिंग ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे,” असं एअर इंडियातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान विस्तारा एअरलाईन्सने मात्र १५ एप्रिलपासून विमानांचे बुकिंग सुरू केले आहे. लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत आहे, त्यानंतर सरकारकडून काय सूचना येतात ते पाहून निर्णय़ घेऊ पण तोपर्यंत बुकिंग सुरू केले असल्याचे विस्तारा एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे.