राजभवनात कोरोना: माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे, आता तरी यूजीसीला पटेल का? उदय सामंत यांचं ट्विट
X
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची वाढ थांबलेली नाही. मुंबईतील काही भागात कोरोनाला रोखण्यात यश आलं असलं तरी कोरोनाच्या रुग्णांची वाढ थांबलेली नाही. त्यातच राजभवनातील जवळपास १८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ते पॉझिटीव्ह आढळले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यपालांनी सर्व टेस्ट करुन घेतल्या असल्याचं सांगत त्यांना कोणतीही लक्षण आढळले नसल्याचं ट्विट केलं आहे.
दरम्यान राजभवनात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा घेणं किती धोकादायक आहे हे दिसून येत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आज सकाळी राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर सामंत यांनी ट्विट केलं आहे.
“राजभवनात कोरोना.. अमिताभजींना कोरोना.. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?,” असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांबरोबरच कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलेला असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करू नये अशी भूमिका घेतली आहे. त्यावरुन सामंत यांनी हे टिकात्मक ट्विट केलं आहे.
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
— Uday Samant (@samant_uday) July 12, 2020