राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्या पाठिशी? तुकाराम मुंढेंच्या की नागपूर महापालिकेच्या?
X
सध्या नागपूर महापालिकेचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांसोबतचा संघर्ष गाजतोय. मुंढे हे कुठेही असले तरी तिथल्या सत्ताधाऱ्यांसोबत त्यांचा संघर्ष होतो. याचसंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी तुकाराम मुंढेंबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. काय म्हटले आहेत ते पाहूया....
संजय राऊत - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की त्या लोकनियुक्त महापालिकेच्या, जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन?
मुख्यमंत्री - तुमचं मत काय? कोणाचं बरोबर आहे?
संजय राऊत - मला असं वाटतं की, तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे.
मुख्यमंत्री - मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे
संजय राऊत - अर्थात शिस्तीच्या मागे उभे राहायला हवे.
मुख्यमंत्री - मग तसंच आहे.
एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू शकतो, असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱयाच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलं आहे.
शेवटी जनतासुद्धा उघडय़ा डोळय़ांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही.