महाविकासआघाडीची 'तीन माणसं' बोलली की रडली? आशिष शेलरांचे टीकास्त्र
X
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्याला आज महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, शिवसेनेकडून अनिल परब तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची बाजू मांडली.
या पत्रकार परिषदेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी 'आघाडीची तीन माणसं बोलली की रडली' असं म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणं सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने तर कधी विरोधी पक्षाच्या नावानं रडायचं. ही रडगाणी थांबवा आणि कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा असं शेलार यांनी म्हटलंय.
आघाडीची तीन माणसं बोलली, पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला, असं आव्हान त्यांनी राज्य सरकारला केलंय.