उ. प्रदेशात गुंडांच्या गोळीबारात ८ पोलीस शहीद, कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
X
उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यामधल्या डिकरु गावात गुंडांसोबत झालेल्या चकमकीत आठ पोलीस शहीद झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.
या गावामध्ये कुख्यात गुंड विकास तुबे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक गेलं होतं. या पथकावर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलिस शहीद झालेले आहेत. तर सात पोलिस जखमी झालेले आहेत.
जखमी पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास दुबे या गुंडावर खुनाचा आरोप आहे आणि त्या संदर्भातच कारवाईसाठी पोलिस गेले होते. या गावात पोलीस गेले तेव्हा तिथे जेसीबीने रस्ता अडवण्यात आला होता.
पोलीस खाली उतरताच या गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. पण गुंडांची संख्या खूपच जास्त असल्याने यात आठ पोलीस शहीद झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेल्याची देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
या ठिकाणी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने पाठवण्यात आलेले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय. पोलिस कारवाईसाठी या गावात जात आहेत ही माहिती या गुंडांपर्यंत कशी पोहोचली असा प्रश्न आता उपस्थित होतोय.