जनतेचा जाहीरनामा: आता आम्ही जगायचं कसं?
Max Maharashtra | 14 Oct 2019 3:59 PM GMT
X
X
मोदींनी प्लास्टिक बंदी करून त्यावर जगणाऱ्या आम्हा गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे. आधी प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक विकून आम्हाला पैसे मिळायचे. बाटल्यांचा दर आज २० ते २५ रूपये किलोवरून ४ ते ५ रूपये किलोवर आला आहे आणि दिवाळीनंतर ते ही विकत घेणार नाही. असं ठेकेदाराने सांगितलंय. त्यामुळे आता आम्ही जगायचं कसं? असा सवाल सूरुड ता. वाई जि. सातारा येथून स्थलांतरीत होऊन कोल्हापुरात तावडे हॉटेल परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत पवार यांनी पंतप्रधान मोदींना केलाय.
https://youtu.be/s01bCBQIEsE
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक गोळा करताना देशानं पाहिलं मात्र, देशभरामध्ये कचरा गोळा करून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या स्वच्छतेचे वाहक असणाऱ्या वर्गावर प्लास्टिक बंदीचे काय परिणाम होतील? याचा जराही विचार सरकारने केला नाही. बेरोजगारीची समस्या देशात असताना या धंद्यातून रोजगार शोधणाऱ्या या लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न उभा राहील. याचा विचार न करता क्षणात प्लास्टिक बंदी करून या कुटुंबांची चूल सरकारने बंद पाडली आहे.
रेखा पवार सांगतात ‘मूळ गावात त्यांचे पती बँड वाजवण्याचा कामाला जात असत, मात्र मालक तुटपुंजी हजेरी देत असल्याने पोटाचा प्रश्न उभा राहिला आणि गोपाळ समाजातील गावातील कुटुंबे कोल्हापुरातील रस्त्याशेजारी झोपडी करून राहायला लागली.
सकाळी भंगार गोळा करणे आणि यात्रेत फुगे खेळणी विकणे. यावर कसाबसा संसार चालवला आता प्लास्टिक बंदीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असं त्या सांगतात. मूळचे साताऱ्यातील सुरुड येथील असणाऱ्या या कुटुंबांना गावात शेती नाही.
अतिक्रमणात खोलीपुरती जागा यांना मिळाली असून सरकारी योजनेतून अजूनही घर मिळालेले नाही. याबाबत पाठपुरावा करून दोन महिन्यांनी घर भेटेल. चार महिन्यांनी भेटेल असे त्यांना सांगण्यात येत आहे. सुरूड येथे या कुटुंबाचे दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव नाही हे विशेष आहे.
प्रशासनाला या लोकांच्या तुटक्या झोपड्यात कोणती श्रीमंती दिसते असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो.. सरकार एका बाजूला गावागावात टीव्हीच्या माध्यमातून विकासाच्या योजनांचा प्रसार करत आहे. मात्र, भंगार गोळा करणाऱ्या गोपाळ समाजाच्या रस्त्याच्या कडेला वस्तीवर अजुन सरकार आणि त्याचा विकास अजूनही पोहोचला नसल्याचे भयाण वास्तव आहे.
मोदींनी समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक गोळा करण्यापेक्षा ज्यांची अख्खी जिंदगी प्लास्टिक गोळा करण्यात गेली. त्या समुहांच्या विकास पाहण्यासाठी एकदातरी अशा वस्त्यांवर फेरफटका मारावा.
Updated : 14 Oct 2019 3:59 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire