अंत्यदर्शनासाठी मानवी साखळी तयार करून पाहुण्यांनी ओलांडली नदी
Max Maharashtra | 16 Sep 2019 3:32 PM GMT
X
X
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर तालुक्यातील पिंपळखुटा महादेव येथील शंकरसिंह बाबुराव मोरे वय ५५ वर्षे यांचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जाताना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना नातेवाईकांनी जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार केल्याचा प्रकार घडलाय. तर काही नातेवाईक दुसऱ्या काठावरचं अडकले अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या लोकांना याठिकाणी गैरसोय झाल्याने या नदीवर उंच पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पिंपळखुटा महादेव या गावात जाण्यासाठी एकच मार्ग असून त्याही मार्गावर नदी असल्याने ही नदी पार करुन जावे लागते. पावसाळ्यात नदीला पानी असले की गावांचा संपर्क तूटतो, दरवर्षी हिच अवस्था असून अश्या जीवघेण्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण, शासकीय कामे या सर्वांसाठी हा एकमेव मार्ग असून पावसाळ्यात बराच काळ रस्ता बंद असल्याने सर्व कामे ठप्प असतात. अशी अवस्था पिंपळखुटा या गावाची झाली आहे.
यातच काल पिंपळखुटा येथील शंकरसिंह बाबुराव मोरे वय ५५ वर्षे यांचे मृत्यू झाला असता त्यांच्यावर अंत्यसंस्कार नदी पलीकडच्या स्मशानभूमी मध्ये करायचे ठरले. त्या नुसार अंत्ययात्रेसाठी बाहेर गावाहुन बरीच मंडळी आलेली होती. मात्र दोन नद्यांचा संगम, दोन्ही नद्यांना पुर आला होता आणि स्मशानभूमि नदीच्या पलीकडच्या काठावर असल्याने तिथे शव घेऊन जाणे मोठे जिकरीचे होते. शव तिथपर्यंत कसेबसे पोहोचविण्यात आले खरे मात्र बाहेर गावावरुन नातेवाईक मंडळी आली तेव्हा त्यांना स्मशानभूमी मध्ये जाऊन अंत्यदर्शन घ्यावयाचे होते.
मात्र नदीला पूर असल्याने जायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांसह नातेवाईकांना पडला होता. तेव्हा ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवी साखळी तयार केली. त्यानंतर काही महिला आणि पुरुषांना नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचविण्याचं काम तरुणांनी केलं. अशाप्रकारे जीव धोक्यात घालणे ग्रामस्थांसाठी नित्याचेच झाले आहे. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा पिंपळखुटा गावाला कायमस्वरूपी रस्ता नाही ही राजकीय आणि प्रशासकीय उदासीनता हेच म्हणावे लागेल.
https://youtu.be/dN1nqcLm-ko
Updated : 16 Sep 2019 3:32 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire