भाजप शब्द पाळेल का? शिवसैनिकांना चिंता
Max Maharashtra | 5 Sep 2019 7:08 AM GMT
X
X
भाजपने विधानसभेसाठी तयारी पूर्ण केली असून अंतिम निर्णयासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. काल वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या जेष्ठ नेत्यांची पहिली बैठक झाली. या बैठकीत भाजपला १४४ पेक्षा जागा कशा मिळतील यावर चर्चा झाल्याचे समजते. भाजपमध्ये आलेले आमदार त्यांच्या जागा राखून किमान १६० जागा मिळायालाच हव्यात असा आग्रह भाजपने धरावा असेही बैठकीत ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे शिवसेनेला युतीच्या जागा वाटपाबाबत चिंता सतावत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, उद्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बैठकीत ५०-५० टक्के जागावाटप असा फार्म्यला ठरला असला तरी भाजपमध्ये इनकमिंगची संख्या वाढल्याने वाटा अधिक वाढतोय की काय असे चित्र निर्माण झाले आहे. आणि म्हणूनच संजय राऊत यांना माध्यमांना प्रतिक्रिया देऊन अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीची आठवण करून द्यावी लागली.
सध्या भाजपचे १२२ आमदार आहेत. त्यात कालीदास कोंलंबकर, गणेश नाईक, शिवेंद्रराजे, मधुकर पिचड, अशा दिग्गजांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे ही संख्या आता तब्बल १७० वर पोहचली आहे.
महत्वाचं म्हणजे नारायण राणे भाजपचे खासदार आहेत. आणि त्यांचा पक्षही विधानसभेत ३-४ जागांवर दावा करणार आहे. भाजपला युतीत घेतले तर शिवसेनेला ते आवडणार नाही. कणकवली, सावंतवाडी, मालवण, कुडाळ या भागातल्या आपल्या सामर्थ्याचा वापर करून राणे यांना आपलं अस्तित्व टीकावयचं असल्याने ते सध्या भाजपबरोबरच जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेत राणे विषय निकालात निघाल्याशिवाय अंतिम निर्णय होणार नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढली होती. पण विधानसभेत मात्र जागा वाटपावरून बिनसलं होतं. भाजपने गद्दारी केली अशी सल शिवसैनिकांना आहे. त्यात पाच वर्षात भाजपने अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिल्याचा रागही आहे. पण या वेळेला लोकसभेसाठी अमित शहा यांनी मातोश्री गाठली आणि प्रसंग पाहून उद्धव ठाकरे यांनी युती केली ती विधानसेभच्या समान जागा वाटपाची अट ठेऊनच.
पण लोकसभेच्या विजयात भाजपचा आत्मविश्वास जास्त वाढला असून काँग्रेस राष्ट्रवादीची वाताहत पहाता स्वबळावर निवडणुक लढवल्यास सत्ता मिळणारच असा दावा भाजप कार्यकर्त्यांचा आहे. शिवसेना सोबत नसली तरी शिवसेनेला ८० ते ८५ च्या पुढे जागा मिळणार नाहीत असे गणितही भाजप नेते खाजगीत मांडतात. त्यामुळे पक्षार्तंगत युती नको अशी चर्चा सुरू असल्याचं भाजप सूत्र सांगतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र युतीच्या बाजूने आहेत.
जागा वाटपाची चर्चा गणेशविसर्जनानंतर संपेल असं जरी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं तरी दोन्ही पक्षांनी आपले २८८ उमेदवार तयार ठेवले आहेत. त्यामुळे जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत शिवसेनेला धाकधुक राहणारच आहे.
Updated : 5 Sep 2019 7:08 AM GMT
Tags: @Devendra Fadnavis amit shah bjp maharashtra SANJAY RAUT Shivsena uddhav thackrey vidhansabha elections
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire