Home > मॅक्स रिपोर्ट > कसा केला जातो फोन टॅप? काय आहे फोन टॅपींग प्रकरण?

कसा केला जातो फोन टॅप? काय आहे फोन टॅपींग प्रकरण?

कसा केला जातो फोन टॅप? काय आहे फोन टॅपींग प्रकरण?
X

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...

“दिग्विजय सिंह यांनी फडणवीस सरकारकडून विरोधीपक्षाचे आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याचं म्हटलं आहे. आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेत इतर पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान घेण्यासाठी इस्त्राईलला कोण गेलं होतं याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.” असं देशमुख यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

काय म्हटलंय दिग्विजय सिंह यांनी ट्विट मध्ये?

“मागील सरकारने मला भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदप्रकरणी ‘अर्बन नक्षली’ असल्याचा आरोप केला. मात्र हे एक षडयंत्र असल्याचं सिद्ध झालं. मात्र, चांगले कार्यकर्ते अजूनही तुरुंगात आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार?”

असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केल आहे. विशेष बाब म्हणजे सिंह यांनी आपल्या ट्विट मध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.

त्यानंतर देशमुख यांनी या संदर्भात आज फोन टॅपींग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?

भारतातील अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हाट्सअप मेसेज मे 2019 पर्यंत, त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा, व्हाट्सअपने (WhatsApp) इस्रायलच्या एन एस ओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यामध्ये करण्यात केला आहे.

एन एस ओ (NSO) ही कंपनी पीगेसस नावाचं एक सॉफ्टवेअर बनवते आणि आणि मोबाईल धारकाच्या स्मार्टफोनमध्ये चलाखीने पेरते. ’एक्सप्लॉईट लिंक’ या नावाचा पर्याय जर तुम्ही कळत नकळत क्लिक केलात तर पीगेसस तुमच्या मोबाईल मध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हाट्सअपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पीगेसस वाचू शकतो, हे या खटल्यामुळे उघडकीस आले.

त्यामुळे भारतात मोठी खळबळ उडाली होती. या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट तुम्ही पाहू शकता

दरम्यान आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी या संदर्भात एका वृत्तपत्राचे कात्रण ट्विट केला आहे.

‘तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने (त्यावेळी) दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं बोलणं’ असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या सर्व प्रकरणा संदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली प्रतिक्रिया

दरम्यान या सर्व प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते! या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे. त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे. तथापि, राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी. असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 24 Jan 2020 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top