सोनई दलित हत्याकांडप्रकरणी सहा आरोपी दोषी
X
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथील तिहेरी दलित हत्याकांड खटल्यात आज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवले, तर एकाची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या सहा दोषी आरोपींना १८ जानेवारीला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१३ ला प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई जवळील गणेशवाडी शिवारातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा ही नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी. एड. चे शिक्षण घेत होती. याच संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि सीमा यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हे प्रेम प्रकरण दरंदले कुटुंबाला समजल्यानंतर या प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. सीमाचे वडील व गुन्ह्यातील आरोपी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी कट रचला. दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचे काम करायचे आहे असा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ ला घरी बोलावून घेतले. यावेळी आरोपी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. तर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याला कोयत्याने ठार केले, आणि सचिन घारूला वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस झाले आहे.