Home > मॅक्स रिपोर्ट > 7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार?

7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार?

7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार?
X

मुंबई पासून 100 किमी अंतरावर व जव्हार पासून अवघ्या 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही मुलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत.

स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्यानं येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याअभावी अबाल वृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले, चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आजारी पेशंट झाल्यास लाकडाची डोली करून 6 ते 7 किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य पथक गाठावे लागते. परंतु वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक पेशंट दगावले देखील आहेत. यामुळे येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार ? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

यामधील दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा हे झाप ग्रामपंचायतमध्ये येतात. तर मनमोहाडी पाडा ऐना ग्रामपंचायतमध्ये येतात. भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे पाथर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. या सर्व पाड्यांची एकूण लोकसंख्या चौदाशे च्या आसपास आहे. येथील 200 मुलं पुढील शिक्षण घेत आहेत. परंतु रस्ता नसल्यानं शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. तसेच मनमोहाडी या पाड्याची 80 घराची लोकवस्ती असून नदी ओलांडून त्यांना ये-जा करावी लागत आहे.

यामुळे पावसाळ्यात येथील आदिवासींचा पूर्णपणे संपर्क तुटतो. तसेच यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास येथील आदिवासींसमोर कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. त्याचबरोबर या पाड्याच्या चारही बाजूने डोंगर असल्याने येथे कोणतेच नेटवर्क नाही.

येथील ढवळू रामू गरेल व चांगुणा काकड गरेल यांना सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अश्या अनेक घटना वारंवार येथे घडत आहेत. तसेच मागील वर्षी वडपाड्याजवळ 25 लाखाचा आसपास खर्च करून दीड दोन किमीचा अंतराचा थातूर - माथुर नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्या रस्त्यावर सर्वत्र गवत उगलंय कामात कोणतीच गुणवत्ता नाही. मुळात या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने कुठे तरी थातूर-मातूरकाम करून निधी वाया घालवण्याचा नेमका उद्देश काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कधी होणार?

देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष उलटली या काळात देशात अनेक बद्दल झाले आधुनिकीकरण झाले अनेक गावांचे शहरात रुपांतर झाले. अनेक राजकीय पक्षांकडून विकासाचे आश्वासन देण्यात आली. अनेक निवडणुकांमध्ये गावात रस्ते बांधणार, गावाचा विकास करणार अशी अनेक आश्वासनं लोकप्रतिनिधी कडून देण्यात येतात.

यातूनच दरवर्षी नवीन रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च देखील केला जातो. मात्र, मुंबई राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार तालुक्यातील या आदिवासी पाड्यांना लोकप्रतिनिधी कडून प्रत्येक निवडणुकीला फक्त रस्त्याचे आश्वासन मिळाले. परंतु पक्का रस्ता अजूनपर्यत मिळालेला नाही. ही बाब खेदाने म्हणावी लागेल.तसेच केंद्र सरकारकडून अर्थव्यवस्था काही ट्रिलियनपर्यंत नेणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशाच अनेक अर्थसंकल्पात आदिवासींना अनेक योजना जाहीर होतात. मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र, ह्या योजना येथील आदिवासी पर्यत पोहोचतात का? लोकप्रतिनिधी निवडणुकीत फक्त मत मागायला येतात. त्यांना मतं हवी असतात. येथील विकास नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष उलटी आहेत. परंतु अजूनपर्यंत दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे सोयीसुविधा पासून वंचित आहेत. दळणवळनाची सुविधा नाही. इथे कॅशलेस व डिजिल इंडिया ढोल वाजवला जातो. परंतु या आदिवासी पाड्यात नेटवर्क नसल्याने मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेणार? पेशंट झाल्यास डोली करून खांद्यावर पेशंट घेऊन डोंगर चढाव लागतोय. लोकप्रतिनिधी इकडे फिरकत देखील नाही. लोकप्रतिनिधी निवडणूकीत फक्त मते मागायला येतात. बहुजन विकास आघाडी युवक जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी मॅक्समहाराष्ट्र शी सांगितले.

इथे नेटवर्क नाही डिजिटल इंडियाचा काय उपयोग?

माझा 30 वर्षांचा अनुभव आहे. निवडणुकीत जो उमेदवार आश्वासन देतो. ते एक दिवसाचे असते निवडणूक झाल्यावर पाच वर्षात फिरतही नाही. येथे पेशंट झाल्यावर तो डोली करून झाप पथकात न्यावे लागते. परंतु तेथे गाडी नाही. यावेळी पुढील उपचारासाठी जव्हारला नेताना पेशंट रस्त्यात दगावतो. गरोदर मातांची देखील मोठी परवड होत आहे. शासन डिजिटल इंडियाचा नारा देत आहे. परंतु इथे नेटवर्क नाही. इथे त्याचा उपयोग असे झाप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशिनाथ दरोडा यांनी बोलताना मॅक्समहाराष्ट्र शी सांगितले

माझ्या भावाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला... आमच्या पाड्यांवर दळणवळणाची सुविधा नाही. नेटवर्क नाही यामुळे आमची मुले शिक्षणापासून वंचित रहात आहेत. माझा भाऊ ढवळू गरेल. याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अश्या अनेक घटना वारंवार येथे घडत आहेत. झापग्रामपंचायतीचे उपसरपंच तुकाराम गरेल. यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

Updated : 20 Sep 2020 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top