कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा
X
कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे बळीराजा चांगलाच हवालदिल झाला होता. कांद्याला प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असताना राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांद्याला प्रति क्विंटलमागे २०० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस किलोमागे 1 ते 2 रुपयांचा भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा उत्पादकांचा वाढता रोष लक्षात घेता सरकारनं प्रति क्विंटल 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. 15 डिसेंबरपर्यंत कांदा बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम मिळेल. याशिवाय परराज्यातील कांद्यांच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा विचार आहे. कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कांदा कृषी बाजार समितीमध्ये ज्यादा कांदा दिलेला आहे ते शेतकरी या अनुदानाला पात्र ठरतील.