आमले वाशीयांची जीवघेणी परवड थांबणार.?
Max Maharashtra | 17 Sep 2019 2:55 PM GMT
X
X
तालुक्याच्या मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर वसलेल्या 62 घरवस्ती, 322 लोकसंख्या असलेल्या आमले गाव सरकारच्या दुर्लक्षित कारभारामूळे विकासापासून दूर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमले गावाला जोडणारा पूल नव्हता. परंतू या गावात पाडा समीतीच्या सदस्य व आरोहण च्या प्रयत्नाने गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी येथे पूल बांधण्यात आला.
एका ठिकाणी पूल आहे. परंतू दुसऱ्या ठिकाणी वनविभागाच्या विरोधामुळे पूल खांब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. 2014 पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर पडणं शक्य नसायचं. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोली बनवून 5-6 किमीचे अंतर डोंगर पार करुन दवाखान्यापर्यंत रूग्णांना पोहोच करायचे. त्या अर्धवट खांबाचा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने 2014-15 मध्ये लोखंडी साकव बांधन्यात आला होता. गेली 4-5 वर्षे त्या साकवामुळे पावसाळ्यात देखील लोकांना रहदारी करता येत होती.
परंतू गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या धो-धो पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा लोखंडी पूल (साकव) वाहुन गेल्याने चारही बाजूंनी संपर्क तुटला आहे. मागील दोन महिन्यांपासून या गावातील ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्यास जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
गावाचा संपर्क तुटल्यानंतर लोक कशी जगतात? या मथळ्याखाली 15 सप्टेंबर ला मॅक्समहाराष्ट्राने विशेष बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली आहे.
आमले येथील ब्रिज ची परिस्थिती अत्यंत बिकट आहे तिथे मोटारसायकल घेऊन जाताना दोन्ही बाजूने प्लास्टिक ड्रमचा वापर करावा लागतो मुलांना देखील तारेचा आधार घेऊन ये-जा करावी लागते. हा दुर्दैवी प्रकार आहे.
याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. परंतू त्याची अंमलबजावणी झाली नाही. याकडे गांभीर्याने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त निधीतून प्रत्येक जिल्ह्याला ज्या ठिकाणी ब्रिज वाहून गेले आहेत. रस्ते वाहून गेले आहेत. त्या ठिकाणी विशेष निधी दिला जातो. त्या निधीच्या माध्यमातून आमले येथे प्रत्यक्ष पाहाणी करून आठ दिवसांत पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली जाईल. असं आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिले आहे.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही खासदारांचे आश्वासन तरी पूर्ण होईल का..?
या गावातून तालुक्याच्या ठिकाणी अथवा बाजारात जायचे असल्यास गावकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून गावा बाहेर पडावे लागते. त्यामुळे वृद्ध महिला विद्यार्थी तसंच आजारी रुग्णांना गावा बाहेर पडण्यास मोठी कसरत करावी लागते. गारगाई नदीवरील लोखंडी पूल वाहून दीड महिन्यात पेक्षाही जास्त कालावधी झाला. मात्र, प्रशासन या गावाकडे फिरकलेच नसल्यानं गावकरी हवालदिल झाले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पूरपरिस्थिती दरम्यान तातडीने लोखंडी पूल उभारला जाईल. असं आश्वासन दिलं होतं. मात्र, दोन महिन्यांपासून ना पूल उभारला न अधिकारी किंवा मंत्री महोदय फिरकले या नंतर खासदार राजेंद्र गावित यांनी आठ दिवसात याठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध केले जाणार असल्याचं आश्वासन दिले आहे. हे आश्वासन खासदार महोदय पाळणार का? हा खरा प्रश्न आहे..?
Updated : 17 Sep 2019 2:55 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire