न्यूक्लिअर टीव्ही
X
एक जमाना होता जेव्हा संपूर्ण गावच्या गावं एकत्र येऊन एकाच टीव्हीवर महाभारत किंवा रामायण किंवा इतर कार्यक्रम पाहायची. १९८० च्या दशकातलं हे चित्र होतं. क्वचितच कुणाकडे तरी टीव्ही असायचा. नंतर ९० च्या दशकात वाडी, वस्ती, मोहल्ला, चाळ इथं एखादा टिव्ही असाचा आणि सर्वजण त्या एकाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायचे. आणखी पाच-सहा वर्षात काळ बदलला आणि घरोघरी टीव्ही आले. मग अख्ख कुटुंब एकत्र बसून टीव्ही पाहायला लागलं. आता हाच टीव्ही एकट्यानं किंवा दुकट्यानं पाहिला जातोय. हे आम्ही नाही म्हणत आहोत तर हे बार्क या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून सिद्ध झालंय.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल म्हणजेच बार्क ही टीव्ही क्षेत्रात संशोधन करणारी आपल्या देशातली अग्रगण्य संस्था आहे. बार्कनं यावेळी देशातल्या तब्बल ५९० जिल्ह्यांमधल्या ४३०० शहरं आणि गावांमध्ये जाऊन ३ लाख घरांचा सर्व्हे केला. ज्यातून लक्षात आलं की लोकांच्या घऱातल्या टीव्हीमध्ये गेल्या २ वर्षात तब्बल १९ टक्क्यांची वाढ झालीय. २०१५ साली १५३ दशलक्ष घरांमध्ये टीव्ही होता. यंदाच्या वर्षी हा आकडा १८३ दशलक्ष घरांपर्यंत पोहचला आहे. त्याचं मुख्य कारण आहे विभक्त कुटुंब म्हणजेच न्यूक्लिअर फॅमिली किंवा छोटी-छोटी कुटुंब. महत्त्वाची बाब ही आहे की यातल्या फक्त साडेतीन टक्के घरांमध्येच एकापेक्षा जास्त टीव्ही आहेत. १६ वर्षांपूर्वी आपल्या देशात एक तृतियांश घरांमध्ये टीव्ही होता. आताच्या घडीला दोन तृतियांश घरांमध्ये टीव्ही आहे.
हे सर्वेक्षण टीव्ही बाबात असलं तरी त्यातून एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते आहे ती म्हणजे देशात न्यक्लिअर फॅमिली म्हणजेच छोट्या कुटुंबांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ज्यावर साकल्यानं विचार होणं गरजेचं आहे.
ता.क. – राज्य आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात अगदी वीज नसलेल्या खेड्यात किंवा झोपड्यांमध्ये टीव्ही असलेला मी स्वतः पाहिला आहे. त्यामुळे मनोरंजन ही एक लक्झरी नाही तर गरज बनल्याचं दिसून येतंय.