Home > मॅक्स रिपोर्ट > जैन मुनींवर का डागली सेनेनं तोफ?

जैन मुनींवर का डागली सेनेनं तोफ?

जैन मुनींवर का डागली सेनेनं तोफ?
X

मुंबई : मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मत देण्याचं आवाहन करणारे जैन मुनी नयपद्मसागर यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट दहशतवाद्यांशी तुलना केली आहे. हे मुनी म्हणजे झाकीर नाईक असल्याचंही राऊत म्हणालेत. भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जिंकली असा हल्लाबोल करताना जैन मुनींवर चौफेर तोफ डागलीय.

याशिवाय “हा धार्मिक प्रचार आचारसंहितेचा भंग आहे. या संदर्भात आम्ही केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहोत. अशा धार्मिक गुरुंमुळे कायदा सुवेवस्थेला धोका निर्माण होत आहे. आमच्या प्रत्येक कार्यात जैन समाज सहभागी झालेला आहे. शांतता प्रिय असा हा समाज आहे. मात्र मिरा-भाईंदरमध्ये ज्या प्रकारे जैन मुनींनी गरळ ओकली ती देखील एक प्रकारे हिंसा आहे”, असं राऊत यांनी नमूद केलं.

मांसाहाराला विरोध करणारे हे भाईंदरचे लफंगे उद्या सांगतील की सीमेवरील सैन्याने देखील शाकाहार करावा. अशा लफंग्यांचे ऐकले तर देश बुडेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नेमकं काय बोलले होते जैन मुनी?

शिवसेना जैन मुनी नयपद्मसागर यांच्याबाबत एवढी आक्रमक का झाली? असं काय बोलले होते हे जैनमुनी? या मुनींनी निवडणुकीत अत्यंत आक्रमक व्हीडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हीडीओत ते अत्यंत त्वेषानं बोलताना दिसत आहेत “ही निवडणूक आर-पारची लढाई आहे. या निवडणुकीत हिंसा जिंकणार की अहिंसा जिंकणार याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. तुमचं एक मत पर्युषण काळात हजारो पशुंना जीवदान देईल. तुम्ही मत दिलं नाही तर नवे कत्तलखाने खुले होतील, तुम्ही मत दिलं नाही तर पर्युषण काळात मंदिराबाहेर कोंबड्या शिजवल्या जातील. तुम्ही मत दिलं नाही तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दुबळे होतील. तुम्ही मत दिलं नाही तर घरोघरी, रस्त्यावर ऑम्लेटच्या गाड्या दिसतील. त्यामुळे माझं तुम्हाला आवाहन आहे, की मिरा भाईंदर पवित्र ठेवायचं असेल, मिरा भाईंदर गुन्हेगारमुक्त करायचं असेल तर भाजपला मत द्या” असं थेट आवाहन जैन मुनी नयपद्मसागर यांनी केले होते. जैन मुनी नेमके काय म्हणाले होते, ते पाहा या लिंकवर

https://www.youtube.com/watch?v=tuN2a1LOaCM

Updated : 23 Aug 2017 3:11 PM GMT
Next Story
Share it
Top