#माझंमत : वीज बिलात अडकलेला शेतकरी - संदीपान खेडकर
X
सरकारपर्यंत पोहचणार असेल तर एक शेतकरी पुत्र म्हणून #माझंमत
शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतीमालाला हमीभाव द्या आणि शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्या. तसं हे सर्वांचच मत आहे. मला एक छोटा पण महत्वाचा मुद्दा शेतकऱ्याच्या वीजपंपावर आकारल्या जाणाऱ्या वीजबीलाविषयी मांडायचा आहे. कालच वीजदर अजून महागले आहेत. शेतकऱ्यांना सवलतीत वीज आणि महत्वाचं म्हणजे ती रात्री न देता दिवसा देण्यात यावी ज्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला हवी.शेतीच्या वीजपंपावर आकारले जाणारे बील हे प्रत्यक्ष मीटर रीडिंग वरून घ्यावे.
महाराष्ट्राच्या कित्येक भागात दुष्काळामुळे बारामाही प्यायलाच पाणी उपलब्ध नसते. तर शेतीसाठी कुठून येणार. यात आधी सुसूत्रता आणावी. वीजेचा जेवढा वापर झाला तेवढेच बील आकारावे, जसे की मराठवाड्यात शेतीसाठी वीज ही फक्त हंगामीच वापरली जाते (सप्टेंबर ते डिसेंबर =४ महिने) परंतु मीटर मात्र बारा महिने सुरू. ज्यामुळे शेतकरी सुद्धा वीजबील भरायला दुर्बल होतो परिणामी वीजवितरणवाले मीटर कापून टाकतात. मीटरप्रमाणे कधीच बील आकारले जात नाही. (माझ्या बोरगांव चकला ता.शिरूर कासार जि.बीड या गावातील ही बाब आहे)
उद्योगांना नाही पण शेतकऱ्यांना वीज सवलत द्यावी. शक्य नसेल तर किमान ही जास्तीची बील आकारणी थांबवावी. हंगामी काळात एका तासात दहा वेळा वीज गायब होते. शेतकऱ्याला शेतीला व्यवस्थित पाणी तर नाहीच देता येत परंतु वीजयंत्रही जळून खाक होतात. दुरूस्तीचा खर्च वाढतो. मायबाप सरकारला विनंती आहे की शेतकरी सक्षम फक्त कर्जमाफीने नव्हे तर अशा छोट्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक केल्याने होईल. जेणेकरून आपल्याला अभिप्रेत असलेला कर्जमुक्त शेतकरी अस्तित्वात येईल.
धन्यवाद !!
-संदिपान खेडकर, बीड