- अॅड. प्रकाश आंबेडकर
कट्टरवादी शक्तींचा वैचारिक प्रतिवाद करता येणे शक्य नाही. त्यांना विचार करणे ही प्रक्रियाच मान्य नाही. त्यांचा बंदोबस्त झाला नाही, तर महाराष्ट्राचा पाकिस्तान बनेल.
- श्याम मानव
काही वर्षांपूर्वीच्या या दोन प्रतिक्रिया बोलक्या आणि गंभीर आहेत. त्या मोठ्या अस्वस्थ वास्तवातून आल्या आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून करण्यात आले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या खुनांचे समर्थन करण्यात आले. गौरी लंकेश यांच्या खुनावर तर उघडपणे गरळ ओकणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. विचार मांडणे आणि धमक्या देणे यांतले अंतर मिटले. ज्या आदरणीयांचे खून झाले, त्यांचा उल्लेख ‘आरेतुरे’ने करून जाहीर अवमान केला गेला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मानव यांच्या प्रतिक्रियांनी पुरोगामी चळवळीसमोर काय वाढून ठेवलेय त्याची दिशा स्पष्ट केली.
कट्टरवादी शक्तींना रक्तरंजित लढाई हवीच असते. लोकशाही कायद्याच्या राज्यात कट्टरवाद्यांचा मुकाबला कट्टरवादाने होणार नाही. गोळीला उत्तर गोळी हे कधी नसतेच. आता खरी लढाई राजकीय आहे. ही लढाई आक्रमक पद्धतीने, जनतेचा अजेंडा सोबतीला घेऊन लढावी लागेल. पुरोगामी चळवळीला भाबडे विचार गुंडाळून ठेवावे लागतील. माणूस मारून विचार मरत नाही, हा भोळा आशावाद झाला. माणसेही मारता येतात आणि विचारांचीही पीछेहाट करता येते हा इतिहास आहे. हे होऊ द्यायचे नसेल, तर कणखर राजकीय लढाया कराव्या लागतात. त्या लढाईची महाराष्ट्रात वेळ आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र उठवावा लागेल.
हे कसे घडेल?
गांधींचा सामान्य हिंदू माणूस जागा असेल, तर नथुरामींची पीछेहाट ठरलेली असते. बाबासाहेबांचा संविधानावर प्रेम करणारा कार्यकर्ता सक्रिय असेल तर अन्याय करणाऱ्यांची दातखीळ बसते. त्यांची अन्यायाची भाषा बोलण्याचीदेखील हिंमत होत नाही. हे यापूर्वी दिसले, घडले आहे. आज पुन्हा गांधींचा सामान्य माणूस आणि बाबासाहेबांचा संविधानवादी कार्यकर्ता यांना पुढे यावे लागेल. त्यासाठी गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, राजकीय ‘तमाशा’ करून दाखवण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्रात कट्टरवाद्यांशी लढताना बिहारपासून काही धडे घेता येतील. बिहारात विधानसभेचा रणसंग्राम सुरू आहे. या संग्रामात नीतिश कुमारांनी आखलेली रणनीती उल्लेखनीय आहे. नीतिश कुमारांनी आरक्षणविरोधी आवाज काढणाऱ्यांना गप्प केले. ते कशाच्या बळावर? नीतिश कुमारांमागे मध्यम जाती, मागास, अल्पसंख्यांक यांची भक्कम एकजूट उभी दिसते. त्या एकजुटीपुढे आरक्षणाचा फेरविचार करणाऱ्यांची भाषा बंद होते. खोटा प्रचार करणारे उघडे पडतात. हे केवळ सामान्य हिंदू माणूस नीतिश कुमारांना बळ देतो म्हणून घडते आहे. बिहारसारखी मध्यम जाती, मागास, दलित, अल्पसंख्यांकांची फळी महाराष्ट्रात उभी केली तर राजकीय ‘तमाशा’ जरूर होईल. गांधी, बाबासाहेबांच्या माणसांना तो करावाच लागेल. अन्यथा फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
तमाशा करायचा, तर गांधींची विलक्षण स्ट्रॅटेजी समजून घेतली पाहिजे. टिळक म्हणत, ‘शठं प्रतिशाठ्यं’. गांधी म्हणत, ‘शठं प्रति सत्यं’. गांधी टिळकांचा राजकीय संघर्ष पुढे नेत होते. पण नामदार गोखले माझे राजकीय गुरु आहेत, असं म्हणत होते. चळवळीची प्रेरणा जहाल. पण भाषा, प्रतिमा वगैरे सामग्री सौम्य, सभ्य.
या विलक्षण स्ट्रॅटेजीने ‘तमाशा’ करून दाखवता येईल. असा तमाशा झाला, तर तख्ताचीही उलटपालट होते.