Home > News Update > अरबी दणका!

अरबी दणका!

अरबी दणका!
X

अरबी लोक आणि भारतीय उपखंडामधील व्यवहार, व्यापार, नाते हे काही अलिकडचे नाही. तीन हजार वर्षांहून अधिक काळापासून अरबी लोकांशी भारतीय उपखंडातील विविध राज्यांचा, संस्थानांचा व्यापार सुरू आहे. धौ (किंवा ढव) घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरणारे अरब स्वतःच्या देशातून सुका मेवा, खजूर, मोती, आणि भारतीय राजांच्या आपसात लढायांसाठी लागणारे घोडे घेऊन येत आणि जाताना मसाले, भारतीय कापड, धान्यधुन्य घेऊन परतत. या किनारी प्रदेशात त्यांनी लग्नेही केली.

इ.स. सातव्या शतकात इस्लाम धर्माची संस्थापना झाल्यानंतर अरबी टोळ्यांनी व्यापलेला सारा भूभाग इस्लामच्या अधिपत्याखाली गेला. आधीचे हे टोळीवाले इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतरही येतच राहिले. म्हणजे गेल्या चौदाशे वर्षांत आणि त्याआधीच्या सोळाशे वर्षांपासून भारतीय उपखंडातील विविध धर्मी लोक आणि अरब लोकांचे संबंध आहेत. जेनेटिक्स संबधित अभ्यासानुसार भारतातील अनेक लोकांत, विशेषतः मुस्लिम लोकांमध्ये अरब गुणसूत्रे स्पष्टपणे सापडली आहेत. अरबांशी संबंधित अनेक राजवटी भारतात नांदल्या. आणि त्या इथल्याच झाल्या. भारतीय-अरब विवाह संबंधातून झालेली संततीही गेल्या तीन हजार वर्षांपासून भारतीयच आहे.

तेलाचा शोध आणि त्यातून आलेली श्रीमंती अरबस्तानात आली. तेव्हापासून भारतातील विशेषतः पश्चिम किनाऱ्यावरचे मुस्लिम लोक, जे बहुतांश आपले गणगोत आहेत. असेच अरब मानत असत. म्हणूनच ते गल्फमध्ये नोकरीचाकरीसाठी जाऊ लागले. इथले हिरवे कंच कोकण, कारवार, केरळ सोडून वाळवंटात जायचे दुःख असले तरीही इथल्या दारिद्र्याला दूर करणारा पैसा हवाहवासा होता. सुरुवातीच्या काळात तेलविहिरी आणि क्रूडच्या उद्योगात अकुशल कामगार म्हणून जाणाऱ्यांत अशिक्षित-अर्धशिक्षिता मुस्लिम तरुणांचा भरणा होता. पण जसजशी अरबस्तानाची भरभराट होत गेली. तसतसे अर्थव्यवहार करण्याचे सांभाळण्याचे कौशल्य असलेले सर्व धर्मांचे आणि जातींचे भारतीय गल्फमध्ये जाऊन नोकऱ्या करू लागले. हे गेल्या पाच दशकांपासून घडत आले आहे.

या स्थलांतरात इतके सातत्य राहिले याचाच अर्थ असा की, कुठल्याही धर्माचे असले तरीही या देशांत शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर या नोकरदारांना त्रास नव्हता. तरीही ते बैलाचे मांस खातात, उंट खातात, अजानचा वैताग असतो. वगैरे कुरकुर करणारे भारतीय असतच. आम्ही तिथे सुखी नाही. असे कुंथत तिथेच राहून सोने नाणे, रग्गड मालमत्ता कमवायला त्यांची तक्रार नसे.

बाबरी मशीद पाडण्याच्या काही वर्षे आधीपासून संघ परिवाराने मुसलमानांविरुद्ध हिंदू भारतीयांत विष घोळून वातावरण तापवत नेले. इस्लामी म्हणवणाऱ्या दहशतवादी वहाबी परिवाराने सगळ्या जगातच विष घोळवायला आणि दहशतीचे राजकारण करायला सुरुवात केली. याचा संघी विचारसरणीला फायदाच झाला. म्लेंच्छ-यवनांचे पारिपत्य वगैरे फडतूस पोकळ कल्पना नाचवताना इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवाया सामान्य मुसलमान लोकांच्याच आहेत. असे ठसवायला यांनी सुरुवात केली.

एका मराठी वृत्तपत्रातील एक ज्येष्ठ पत्रकार एखाद्या अपघातात कुणी मुसलमान मरण पावले. असे कळताच केबिनच्या बाहेर येऊन गुदगुल्या झाल्यागत जाहीर करत- ‘दोन यवन मेंलें’. ही घटना ऐंशीच्या दशकातील. आज याच भावनेचा गुणाकार झाला आहे. आणि ‘यवन’ अपघातात मेल्यावर होणारा आनंद आता ‘यवनांना’ मारून आनंद मिळवण्यापर्यंत परिणत झाला आहे.

पण याच काळात अरब राज्यांत, इस्लामबहुल देशांत लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करणारे काही देशात परतले नाहीत. तिथेच राहून इथल्या कट्टर-हिंदुत्ववादी हलकटपणावर टाळ्या पिटणारे खूप आहेत. करोनाच्या पकडीत जग सापडले असताना, ‘आपल्या’ सरकारची कार्यक्षमता कमी पडत असताना, आपली सत्ता नसलेल्या राज्यांची सरकारे उत्तम प्रकारे काम करीत असताना डळमळीत झालेल्या संघटनांच्या लोकांनी पुन्हा नव्याने मुस्लिम द्वेषाच्या खेळ्या करायला सुरुवात केली. तबलिगी मूर्खपणाला अधोरेखित करायचे आणि आपल्या यज्ञयाग- यात्रा-लग्नसमारंभांच्या गर्दीचा बथ्थडपणा झाकून ठेवायचा. या खेळ्यांत बेताल झालेल्या पाळीव कुत्र्यांच्या भूमिकेतील पत्रकारांना पूर्णतः साथ दिली.

राहूनराहून वाटत होते, यांनी इथे उधळलेले मुस्लिम द्वेषाचे भडक रंग जेव्हा कधी अऱब जगाच्या ध्यानात येतील तेव्हा काय होईल! उठसूट मुसलमानांना पाकिस्तानात परत जा म्हणणारी संघी साच्यात घडलेली जमात अरब जगाने भुवई उंचावली तर काय करील! तिथे राहून इथल्या डबक्यात अरबांनी कशी मित्राची बायको पळवली. वगैरे पेडणेकरी किस्से रंगवणारे भ्याड तेव्हा काय करतील...

द्वेषीशिरोमणी ठरून राजकीय शिडी चढण्याची घाई लागलेल्या तेजस्वी सूर्या नावाच्या अंधाऱ्या माणसाचे चार वर्षांपूर्वीचे ट्वीट अरब जगाच्या दृष्टोत्पत्तीस येण्याचे निमित्त घडले आहे. आणि इतके दिवस भारतीयांना सरसकट आपलं मानणाऱ्या या अरब जगात खळबळ माजली आहे. तरीही त्यांची शेखा हेंद अल फैझल कसिमीने या संदर्भात जे जाहीर विधान केले, ते या असल्या लोकांना स्वतःची लाज वाटावी. इतके सभ्य आणि सुसंस्कृत आहे.

'असे बोलणारा माणूस भारताने संसदेतून काढून टाकावा. सगळेच भारतीय असे नाहीत. याची मला खात्री आहे, मी लहानपणापासून भारतीयांबरोबर वाढले आहे, आणि सारेच भारतीय असे नसावेत. हे मी सांगू शकते'.

असे म्हणणाऱ्या त्या राजकन्येला खरोखरच येथील विषाची व्याप्ती माहीत नाही. पण अरब जगातील अनेक व्यक्ती आता भारतातून येणाऱ्या ट्वीट्सवर, सोशल मिडियातील प्रचारावर लक्ष ठेवू लागले आहेत एवढे नक्की.

या मध्यपूर्वेतील जगातून भारताला काय मिळते? याचा काही अंदाज आहे का? या द्वेषाने आंधळ्या झालेल्यांना आणि आयटीसेलने घातलेले धडे बिनडोकपणे गिरवणाऱ्या ट्रोलसंघींना? आज भारतात येणाऱ्या एकंदर विदेशी चलनापैकी ५३ टक्क्यांच्या आसपास विदेशी चलन मध्यपूर्वेकडील मुस्लिम देशांतून, अऱब अमिरातींकडून येते. तेलासाठी तर सारे जग त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि जगाने आपल्याकडून तेल घ्यावे. ही त्यांचीही गरज असली तरीही त्यांच्या हातीच डाव आहे. शिवाय भारतातून जाणारा भाजीपाला, फळफळावळ, दूधदुभतं, धान्य आणि मांस या मालाचे फार मोठे गिऱ्हाईक हे मुस्लिम जग आहे.

यातील अनेक गोष्टी त्यांना कदाचित् इतरत्र असलेल्या पेठांतूनही मिळतील. जुने- म्हणजे तीन हजार वर्षे जुने व्यापारी संबंध असल्याचा आपल्याला जो फायदा मिळतो आहे. तो या गेल्या चार दशकात कंठ फुटलेल्या, आणि गेल्या दहा वर्षात शब्दांगणिक चाळीस पैशाची कमाई करणाऱ्या दळिद्री लोकांमुळे गोत्यात येऊ शकतो. अरब जगातील काहींनी मुस्लिमांकडून काहीही घेऊ नये, त्यांना थारा देऊ नये या आवाहनांची दखल घेतली आहे. आणि आम्ही आमच्याकडील अल्पसंख्यांशी असेच वागलो तर काय होईल याचा विचार करावा असे सूचितही केले आहे.

आता मात्र हातभर फाटली...

आणि ताबडतोब मोदीजींनी आपल्या लोकांना, आपल्यातल्या तिकडे जाऊन दुगाण्या झाडणाऱ्यांना तंबी दिली. हिंदूनाझींना एक गोष्ट लवकरच पचवावी लागेल. जर्मन नाझींना मोकळे रान होते. तसे तुम्हाला नाही. जास्त उड्या माराल तर जगभरच्या इतर धर्मीयांच्या प्राबल्याखालील सत्ता तुम्हाला फार मोकळे सोडणार नाही. लिबरल हिंदू जन्मीयांना शिव्या घालण्याइतकं सोपं काम नसेल ते. फार तर एक दोन निवडणुका असल्या भाडोत्री द्वेषावर जिंकाल, गर्व से फुगून जाल. पण नंतर मात्र तुम्हाला दाभण लागेल. निःपात होईल.

तेव्हा तात्यामंडळी, जरा जपून.

Updated : 26 April 2020 3:23 AM GMT
Next Story
Share it
Top