राजगति; जे तुम्हाला जागृत राहण्यासाठी प्रेरित करते
Max Maharashtra | 6 Sep 2019 4:07 AM GMT
X
X
कला केवळ कलेसाठी नाही आणि कला हे केवळ मनोरंजन करण्याचे साधन नाही. तर कलेचे मूळ काम आहे वास्तवात झोपल्या माणसांना जागृत करणे. त्यांच्या चेतनेला आव्हान देणे, त्यांना स्वतःला प्रश्न विचारण्यास प्रेरित करणे. 12 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईतील श्री शिवाजी नाट्यमंदिर मध्ये "राजगति" नाटक पाहणे, यासाठी आल्हाददायक होते की, हे नाटक कलेच्या मूळ स्वभावासहित रंगमंचावर प्रस्तुत झाले.
'थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्य सिद्धांताचे प्रवर्तक मंजुल भारद्वाज यांचे राजगति नाटक ही नवीन प्रस्तुती आहे. त्यांच्या नाट्य चळवळीला आणि कलात्मक यात्रेला 27 वर्षे पूर्ण होऊन 28 व्या वर्षाला सुरुवात झाली.
मंजुल भारद्वाज हे केवळ नाटककार नाहीत. केवळ मंचावर नाटक प्रस्तुत करण्याला आपल्या भूमिकेची पूर्तता नाही मानत तर त्यांचा विश्वास आहे की, कलाकारांची भूमिका माणसाला आणि समाजाला सकारात्मक बदलाकरिता प्रेरीत करणे, तसेच सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक आव्हानांचे अनावरण करणे आणि त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कलात्मक मार्ग दाखवणे ही आहे. जेणेकरून प्रत्येक मनुष्य एक नवा आणि उत्तम समाज घडविण्यात आपली भूमिका बजावू शकेल.
मनुष्य हा मुळात बाकीच्या प्राण्यांसारखा जीव आहे. जो जन्म घेतो, मृत्यू येईपर्यंत जगतो आणि मृत्यूनंतर पंचतत्वामध्ये विलीन होतो. परंतु साहित्य, संगीत आणि कला मानवाला इतर सजीवांपेक्षा वेगळे करते. साहित्य, संगीत आणि कलेचा सुंदर उपयोग मंजुल यांच्या नाट्यनिर्मितीमध्ये पाहायला मिळतो.
म्हणायला गेलं तर "राजगति" हे एक राजनैतिक नाटक आहे. परंतु प्रत्यक्षात ते आपल्याला जीवनातील विविध पैलूंचा साक्षात्कार करवते आणि हे सत्य देखील प्रकट करते की, राजकारण व्यक्तीपासून वेगळे नाही. राजकारणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर थेट होतो. राजनीती व्यक्तीला पुढे घेऊन जाते आणि पुढे जाण्यापासून विचलित ही करते आणि भरकटवतेसुद्धा.
राजगतिची सुरुवात इथूनच होते, जिथे सामान्य माणूस राजकारण गलिच्छ मानतो आणि त्यापासून दूर राहतो. तो म्हणतो की आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही डॉक्टर आहोत, अभियंते आहोत, राजकारणाशी आमचा काय संबंध आहे? हो, परंतु सामान्य माणूस मतदानाला आपले कर्तव्य मानत आहे. मतदान हा आपला अधिकार मानतो आणि मतदान करू इच्छितो आणि अधिक लोकांना मत देण्यासाठी देखील प्रेरित करतो. नाटककार विचारतात, मतदान करणे म्हणजे राजकारण नाही का? कोणाला मतदान करावे हे समजून घेणे महत्वाचे नाही का? जेव्हा मतदान करणे अधिकार आणि कर्तव्य दोन्ही आहे, तिथे आपण राजकारणापासून दूर कसे राहू शकता?
याप्रमाणे बघितले तर आज जे राजनैतिक परीदृश्य आपल्यासमोर घडत आहे, त्याला जबाबदार फक्त नेते नाही, तर सामान्य माणूस देखील आहे. तो जश्या व्यक्तींना नेता म्हणून निवडून देतो, तसेच व्यक्ती नेता बनून त्याच्या समोर उभे राहतात आणि तसेच राजतंत्र चालते.
राजगतिच्या माध्यमातून नाटककार मंजुल भारद्वाज यांनी भारतीय राजनीतीच्या विभिन्न आयामांचे पुनर्वालोकन करण्याचे कार्य केले आहे. मार्क्स, गांधी, भगत सिंग आणि आंबेडकरांच्या चिंतनाला नाट्यपाठाचा मूळ विषय बनवले आहे.
जग मार्क्सला आधुनिक राजकारणाचा प्रणेता मानते, पण मंजुल यांचे हे म्हणणे आहे की मार्क्सचे चिंतन अपूर्ण आहे. त्यांनी सत्ता परिवर्तनाचा मार्ग तर आलोकीत केला, पण चरित्र निर्माणावर गप्प राहिले. परिणाम हा झाला की जगाच्या विभिन्न देशांमध्ये सत्तेत परिवर्तन झाले, पण व्यवस्था नाही बदलली. शोषणाचे चक्र पूर्ववत चालत राहिले. शोषकांचे चेहरे बदलत राहिले, पण शोषितांच्या जीवनात कोणताही बदल आला नाही. साम्यवाद असो किंवा समाजवाद असो, राजतंत्र असो किंवा लोकतंत्र सगळ्यांच्या मानगुटीवर भांडवलशाही बसली आहे.
परिवर्तनासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये व्यक्तींचा समूह लढत असतो, परंतु अपेक्षित परिणाम येताच, समूह नेपथ्याची भूमिका घेतो आणि व्यक्ति व व्यक्तिवाद उठून दिसतो. आणि मग व्यक्ति पूजा सुरू होते. आणि राजसत्ता पुनः आपल्या मूळ स्वरूपात येते. सत्ता शोषकांच्या पक्षात उभी राहतांना दिसते, कारण चरित्र निर्माण प्रक्रिया झालीच नसते. आणि नाटक हेच संदेश देत आहे की जोपर्यंत चरित्र निर्माणाची प्रक्रिया नाही होणार, व्यवस्था नाही बदलणार. आणि शोषण विरोधी चरित्र निर्माण तोपर्यंत शक्य नाही आहे, जोपर्यंत सांस्कृतिक क्रांती नाही होत.
म्हणजेच साहित्य, संगीत आणि कलाच चरित्र निर्माणाचे काम करते. म्हणून कला जाणकार, कलाकार आणि साहित्यकरांची भूमिका व जबाबदारी वाढते. त्यांचे मनोरंजन किंवा निव्वळ कलेपुरते सीमित होऊन जाणे समाज आणि देशाच्या दुर्दशेचे मूळ कारण आहे.
मंजुल यांच्या नाटकांच्या क्राफ्ट विषयी बोलायला गेलं, तर मंजुल केवळ गोष्टींच्या माध्यमातून विषय वस्तू मांडण्यात विश्वास नाही ठेवत. ते शब्द आणि संवादाच्या माध्यमातून दृश्य रचतात. संवादातून बिंब तयार करतात आणि हे दृश्य रंगमंचापेक्षाही अधिक पटीने प्रेक्षकांच्या मनात आणि मेंदूमध्ये निर्माण करतात.
मंजुल आपली दृश्य बांधणी प्रेक्षकांसमोर नाही ठेवत या ऐवजी प्रेक्षकांच्या चेतनेला संधी देतात की ते नाटक बघतांना सक्रिय राहावेत आणि प्रेक्षक स्वतःचे अनुभव व समज अनुसार स्वतःची दृश्य रचतील. अश्या प्रकारे एक नाटक रंगमंचावर होत असते आणि अनेकानेक नाटक प्रेकाशकांच्या मेंदूतल्या रंगमंचावर घडत असते. याने प्रेक्षकांचा सहभाग वाढतो, प्रेक्षकांची चेतना जागरूक होते आणि उत्तरदायित्वही वाढते. हीच चरित्र निर्माणाची प्रक्रिया आहे.
माणसाच्या आत असलेला शोषक आणि शोषित दोघेही एकत्र भावनांच्या महासागरात सूर मारत असतात आणि अश्याप्रकारे आपल्या मनाची मळभ दूर करतात.
स्क्रिप्ट अशाप्रकारे मंचावर अविरतपणे सुरू राहते की एक क्षणसुद्धा नाटक आणि प्रेक्षकांमध्ये कुठल्याच प्रकारची दरी राहत नाही. आणि नाटक जीवनाप्रमाणे न थांबता ओबडधोबड आणि समतल मार्गांवरून पुढे जात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते. आणि मग मंजुल जेव्हा नाटक संपल्यावर प्रेक्षकांना मंचावर आमंत्रित करतात, तेव्हा प्रेक्षक प्रेक्षक नाही रहात, ते कलाकारांपासून समीक्षक ही होऊन जातात.
कलाकारांचा आपापसातील ताळमेळ, अभिनय आणि पेहराव सहजता पूर्ण होता. म्हणूनच नवीन कलाकार असो किंवा जुने कलाकार सगळेच आपले श्रेष्ठ योगदान देताना दिसतात. विशेषकरून सायली पावसकर आणि कोमल खामकर आपले श्रेष्ठ योगदान देताना दिसतात. सवांदफेक आणि संप्रेषण दोन्हीही अद्भुत दिसून येते आणि तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भावही उठून दिसतात. अश्विनी नांदेडकर संपूर्ण नाट्य प्रस्तुतीची धुरा सांभाळते. मुख्य भूमिकेत तर त्या आहेतच, वरून संपूर्ण समूहाला सांभाळण्याची त्यांची भूमिका ही दिसून येते. आवाजाच्या सीमेला कशाप्रकारे वापरले जाऊ शकते की त्याचे विविध अंदाज घेत श्रेष्ठ रूप धारण करता येईल, हे अश्विनीकडून बाकी कलाकारांना शिकण्याची गरज आहे. कलाकारांच्या आंगिक आणि वाचिक अभिनय दोघांमध्ये सखोल ताळमेळ दिसून येतो.
बाकी कलाकार तुषार, स्वाती वाघ, सुरेखा, बेट्सी एंड्रूज, ईश्वरी भालेराव आणि प्रियंका कांबळे ही प्रभावित करतात. दिग्दर्शन कमालीचे आहे. सहजता आणि दृष्टिसंपन्न.
- धनंजय कुमार
Updated : 6 Sep 2019 4:07 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire