Home > Max Political > रोशनी रोशनाई में डूबी न हो...

रोशनी रोशनाई में डूबी न हो...

रोशनी रोशनाई में डूबी न हो...
X

इसलिए राह संघर्ष की हम चुनें

जिंदगी आंसुओं में नहायी न हो

शाम सहमी न हो, रात हो न डरी

भोर की आँख फिर डबडबाई न हो

सूर्य पर बादलों का न पहरा रहे

रौशनी रोशनाई में डूबी न हो.

अनेक चळवळींना प्रेरणा देणारं हे एक जुनं संघर्षगीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी दिवे लावायला सांगीतलय. अनेक लोकांचं जीवन लॉकडाऊन मुळे प्रभावित झालंय. त्या सर्वांच्या समर्थनार्थ महाशक्तीचा जागर करायचाय. दिवे लावायचे आहेत. प्रकाशाचा उत्सव करायचा आहे. विचार चांगला आहे, आणि घातक ही.

दिवे लावण्यात गैर काही नाही. मी रोज घरात दिवे लावतो. दिवे डिफ्युजरचं काम करतात. देशासाठी ही दिवे लावायला काही हरकत नाही. त्यासाठी मला पॉवरग्रीड ची ही चिंता नाही. भल्या मोठ्या पगारावर इंजिनिअर काम करतात तिथे, त्यांचं कामच आहे, ग्रीड ची स्टेबिलीटी मेन्टेन करणं. खरं तर ग्रीड वर काही परिणाम होऊ शकतो अशी पोस्ट भाजपचे प्रवक्ते आणि विद्युत कंपन्यावर काम केलेले माजी संचालक विश्वास पाठक यांनीच सगळ्यात आधी केली होती. ग्रीड यांची आव्हान आहे अशी त्यांची सकारात्मक पोस्ट होती.

असो, तर दिवे लावण्यात काही चुकीचं नाहीय. ज्या कारणासाठी लावायचे आहेत, त्यावर थोडी चर्चा होणं आवश्यक आहे. मराठीत एक म्हण आहे रोगापेक्षा इलाज भयंकर! कोरोना घातक आहेच, पण त्यावरचा इलाज जास्त भयंकर ठरला आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, दुसरा काही उपाय नाही हे सरकारच्या लक्षात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर जानेवारी मध्येच लक्षात आलं होतं. फेब्रुवारी मध्ये गुजरात सरकारने आपली तयारी ही पूर्ण केल्याच्या बातम्या व्हायरल आहेत.

लिटमस टेस्ट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यु पण लावला. रात्री आठ वाजताच्या जनता के नाम संदेश मुळे लोकांमध्ये गोंधळ होतोय हे पण त्यांच्या लक्षात आलं होतं. तरी सुद्धा चुकांपासून ते काही शिकले नाहीत. सुखवस्तू लोकांच्या गराड्यात राहण्याची सवय झालेल्या त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला भान राहिलं नाही की या देशात बहुसंख्य मजूर-कामगार-शेतकरी दैनंदिन रोजी वर काम करतात. ते स्थलांतरीत आहेत. त्यांच्याकडे निवारा नाही, अन्नाची साठवणूक नाही. त्यांच्या बँकेत २१ दिवसाची रसद पुरवेल इतके पैसे नाहीत. लहानपणी आपण स्टॅचू गेम खेळायचो, पण त्यातही टाइम प्लीज ची सोय होती. मोदींच्या फतव्यात टाइम प्लीज ची सोय नव्हती. एकतर लॉकडाऊन करण्यात केलेला अक्षम्य वेळकाढूपणा आणि नंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अचानक खटका मारून लॉकडाऊन घोषित करणं यात मोदींचा मानवीय चेहरा कुठेच दिसला नाही.

सार्वजनिक वितरण प्रणाली वर आलेला लोड, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचं नियोजन, आरोग्य सेवा आणि सेवकांच्या सुविधा यांची तरतूद यावर ते बोलतच नाहीत. ते इवेन्ट देतात. माझा इवेन्ट ला ही विरोध नाही. उलट या काळात मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगले इवेन्ट दिले पाहीजेत. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी काही कार्यक्रमही दिले पाहीजेत. पंतप्रधानांकडे या दृष्टीकोनाचा अभाव आहे. ते या काळात समाजातील उच्चभ्रू लोकांशी व्हिडीयो कॉन्फरन्स वर बोलत बसले.

दुसरीकडे देशातील हातावर पोट असलेला मजूर-कामगार-शेतकरी वर्ग डोक्यावर सामान घेऊन स्थलातरासाठी रस्त्यावर उतरला. त्याला कोरोना, लॉकडाऊन, त्यानंतर येऊ घातलेली भीषण मंदी याचं काहीच ज्ञान नाहीय. या गोष्टी तसं तर पंतप्रधानांना ही कळत नव्हत्या हा भाग वेगळा. तर या कष्टकरी लोकांना दिलासा देणारं काहीच पंतप्रधान बोलत नाहीत. त्यांची नोकरी-रोजगार राहील की जाईल? त्यांचा मालक त्यांना पुन्हा कामावर घेईल का? मालकाचा कामधंदा शिल्लक राहिल का? आपली उपासमारी होणार नाही ना अशा अनेक प्रश्नांचं गोठोडं डोक्यावर घेऊन बाहेर पडलेल्या भारताला नरेंद्र मोदी यांनी #9PM9Minutes चा इवेन्ट चिटकवलाय.

६ एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिवस , त्या निमित्ताने ही रोषणाई चा सोहळा घेण्यात आल्याची ही चर्चा आहे. सगळीकडेच मोदी पक्ष हीत पाहतात असा त्यांच्यावर आरोप आहे, या आरोपांना बळकटी देण्याचं काम ते वारंवार करतात.

असो, तर मुलभूत प्रश्न बाजूला ठेवून आज रात्री ९ वाजता दिवे लावले जातील. हे दिवे लावताना ‘आपण सत्याचा कुठला प्रकाश झाकोळण्यासाठी हा झगमगाट करतोय? हा साधा प्रश्न मनात डोकावला तरी माणूस म्हणून आपलं जीवन सार्थकी लागलं असं समजायचं.

Updated : 5 April 2020 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top