Home > मॅक्स ब्लॉग्ज > संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट: प्रा.हरी नरके

संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट: प्रा.हरी नरके

संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट: प्रा.हरी नरके
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!"- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी राजीव तुली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संघाच्या जवळकीचे दि प्रिंटमध्ये २३ एप्रिल २०२० रोजी केलेले सर्व दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ आर.एस.एस. हा तर विषवृक्ष आहे!” ते पुढे असेही म्हणतात की, “हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे! काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला जवळ करणेच शक्य नाही.

ठेंगडींची नियुक्ती ह्या निव्वळ हवेतल्या बाता

१. तुलींनी दावा केला आहे की संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून डॉ. आंबेडकरांनी नियुक्ती केली होती. तुली यांचा असाही दावा आहे की ठेंगडी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी १९५४ मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत ठेंगडी यांना आपला निवडणूक प्रतिनिधी नेमले होते. असेच दावे याआधी अरूण आनंद यांनी केले होते. ते मी पुराव्यानिशी फेटाळले होते. पण संघाचा खोटारडेपणा असा की खोटे दावे पुन्हा पुन्हा करीत राहायचे. पण ठेंगडींच्या ह्या नियुक्तीचा लेखी पुरावा तुलींनी सादर केलेला नाही. निवडणूक प्रतिनिधी तोंडी नेमला जात नाही. निवडणूक अधिकार्‍यांना तसे लेखी कळवावे लागते. तुली यांनी ठेंगडींच्या नियुक्तीच्या कपोलकल्पित कहाण्या सांगणे, तोंडी दावे करणे आणि हवेत महाल बांधणे सोडून ठेंगडींच्या नियुक्तीचे लेखीपत्र सादर करावे, विषय संपला.

२. शेकाफेचे महासचिव राजभोज तर म.प्र. सचिव आवळे यांची नियुक्ती

या निवडणुकीचे प्रमुख म्हणून शेकाफेचे अ.भा. जनरल सेक्रेटरी पां. ना. राजभोज व मध्यप्रदेश शेकाफेचे सेक्रेटरी बाबू हरिदास आवळे यांची नियुक्ती डॉ. आंबेडकरांनी केलेली होती. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड,१८ वा, भाग ३ रा ]

३. शेकाफेच्या घटनेनुसार नॉन श्येड्युल्ड कास्ट व्यक्तीची सदस्य वा पदाधिकारी म्हणून जशी नियुक्ती शक्य नव्हती तशीच जी व्यक्ती इतर संघटनेची वा पक्षाची सदस्य असेल तर तिचीही नियुक्ती करता येत नव्हती. ठेंगडी हे नॉन शेड्युल्ड कास्ट असल्याने व ते आर.एस.एस. RSS तसेच भारतीय जनसंघाचे मध्यप्रदेशचे पदाधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती शेकाफेचे सचिव म्हणून होऊ शकत नव्हती. शेकाफेच्या घटनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, Any person belonging to the scheduld castes and Who is not a member of any other political or any social or religious organisatoin can be become a member of SCF. { डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग दुसरा, पृ. 459}

४. निवडणूक भंडार्‍याला ठेंगडी वर्ध्याचे आणि नवखे

शिवाय निवडणूक भंडार्‍याला होती आणि ठेंगडी त्या मतदारसंघातले मतदार नव्हते. ते वर्ध्याच्या आर्वीचे होते. अशा अपरिचित व्यक्तीच्या इलेक्शन एजंट म्हणून केलेल्या नियुक्तीचा निवडणुकीत काय फायदा? ठेंगडी तेव्हा अगदी नवखे होते.

५. तुली एकूण दोन वेगवेगळ्या निवडणुकांबद्दल एकत्र बोलत आहेत. पहिली १९५२ सालची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि दुसरी भंडार्‍याची १९५४ सालची पोटनिवडणूक. भंडारा इथल्या लोकसभा पोटनिवडणूक २ ते ५ मे १९५४ रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेले प्रचार दौरे, भाषणे आणि निवडणुकीची वार्तापत्रे एप्रिल आणि मे १९५४ च्या ‘जनता’ या डॉ. आंबेडकरांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात सविस्तरपणे अनेकदा प्रकाशित झालेली आहेत. जनताचे अंक पुराव्यासाठी आजही उपलब्ध आहेत. या सर्व सभांना उपस्थित असलेले नेते, सभेत भाषणे केलेले नेते यांच्या नावांची मोठी यादी जनतामध्ये आलेली आहे. भंडार्‍याच्या एकाही प्रचार सभेला ठेंगडी हजर नव्हते. ते जर डॉ. आंबेडकरांचे विश्वासू असे निवडणूक प्रतिनिधी होते तर मग ते सर्वच प्रचारसभांना गैरहजर का होते? याचे उत्तर संघ देत नाही. ठेंगडींचा प्रचार सभांमध्ये वक्ता वा मंचावर उपस्थित सदस्य असा साधा उल्लेखसुद्धा जनता या डॉ. आंबेडकारांच्या वर्तमानपत्रामध्ये नाही. यावरूनच सिद्ध होते ठेंगडी बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रतिनिधी नव्हते.

६. जनसंघ- कम्युनिस्टांची युती होती काय?

या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षासह इतर अनेक पक्ष, संघटनांनी स्वत:हून डॉ. आंबेडकरांना पाठिंबा दिलेला होता. कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्री ए. बी. वर्धन हे भंडार्‍याच्या प्रचारसभांना हजर असत. या निवडणुकीत कम्युनिस्ट आणि जनसंघ यांची युती होती व ते एकत्र काम करीत होते असे तुलींना म्हणायचे आहे काय?

७. एक वर्ष नाही अवघे तीन महिने

राजकारणात एका वर्षात काहीही होऊ शकते असे विधान करून डॉ. आंबेडकरांचे आर.एस.एस. ही प्रतिगामी व विघटनवादी असल्याबाबतचे विधान व लोकसभा निवडणूक यात वर्षाचे अंतर होते असे तुली सांगतात. वस्तुस्थिती अशी आहे की इथे तुली १९५२ च्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलत आहेत. " हिंदु महासभा व आर.एस.एस.बरोबर शेकाफेची निवडणुक युती होऊ शकत नाही हा शेकाफेचा बाबासाहेबांनी स्वत: लिहिलेला निवडणूक जाहीरनामा ४ जाने १९५२ रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचाच आहे. तुली म्हणतात तसा तो एक वर्षे आधीचा नसून ऑक्टोबर १९५१ चा आहे. जाहीरनामा लेखन, प्रकाशन, प्रदीर्घ, देशव्यापी प्रचारमोहीम आणि अनेक आठवड्यांमध्ये पार पडलेली निवडणूक या तीन महिन्याच्या काळातील सलग गोष्टी आहेत. १९५१ च्या शेवटी जाहीरनामा व निवडणूक प्रचार झाला व ४ जानेवारी १९५२ ला मतदान झाले असा हा एकत्र कार्यक्रम होता. त्यात १९५१ आणि १९५२ असे वर्षाचे वर्षाचे अंतर नव्हते. [ डॉ. बा.आं.ले.भा. खंड 17 वा, भाग पहिला, दि. 3 ऑक्टोबर 1951, पृ. 402]

८. हिंदूराष्ट्र हे महाभयानक संकट

देशाची फाळणी व इस्लाम याबाबतची डॉ. आंबेडकरांची व संघाची मतं यात खूप साम्य असल्याचा दावा तुली करतात. यासाठी डॉ. आंबेडकरांच्या ज्या "पाकिस्तान किंवा भारताची फाळणी " या पुस्तकाचा हवाला ते देतात, त्याच पुस्तकात आर.एस.एस.बद्दल आंबेडकरांनी संतप्त उद्गार काढलेले आहेत. त्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की आर.एस.एस.आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेत काडीचेही साम्य नव्हते. गोळवलकर गुरूजींचे "बंच ऑफ थॉट" हे आर.एस.एस.चे बायबल आहे. गुरूजी चातुर्वर्ण्य मानतात. सनातन संस्कृती रक्षण, हिंदुराष्ट्राची स्थापना ह्याला प्राधान्य देतात.

९. संघ म्हणजे मान न मान मैं तेरा मेहमान

आंबेडकर म्हणतात, " हिंदू राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये." { पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८, डॉ. बा.आं.ले.भा. खंड 8 वा, 1990, पृ. 358} या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आणि हिंदू राष्ट्रवाला संघ यांच्यात कसलेच साम्य नव्हते. हे म्हणजे " मान न मान मैं तेरा मेहमान" असला लोचट गळेपडूपणा संघाने चालवलेला आहे.

१०. मराठाविरोधी गोळवलकरगुरूजी- संघ हा विषवृक्ष

७ सप्टेंबर १९४९ ला आर.एस.एस.सुप्रिमो गोळवलकर गुरूजी हे कायदामंत्री डॉ. आंबेडकरांना दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडॆ मदत मागितली. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, " आर.एस.एस. हा विषवृक्ष आहे. आर.एस.एस.ला पेशवाईची स्वप्नं पडत आहेत. माझे तुमच्याशी जमूच शकत नाही. मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही." या भेटीची विस्तृत बातमी तिसर्‍या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या जनताने १० सप्टेंबर १९४९ ला दिलेली आहे. शिवाय या दोघांच्या भेटीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोहनलाल शास्त्री प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे. { पाहा: बाबासाहेब डॉ. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली,पृ. ५४/५५}

१०. संविधान आणि हिंदु कोड बिलाला संघाचा विरोध

याच काळात डॉ. आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर.एस.एस. विरोध करीत होती. हिंदु कोड बिलालाही संघाचा विरोध होता. घटना सभेचे कामकाज उधळण्यासाठी आर.एस.एस.चे सदस्य संसदेच्या सभागृहाच्या गॅलरीत घुसले होते अशी नोंद पार्लमेंटच्या दप्तरात आहे. [ पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७ वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९, CAD7/1233 ]

११. हवेतल्या गप्पा मारू नका लेखी पुरावे द्या

लिखित दस्तावेज आणि तोंडी माहिती यात लिखितला प्रथम दर्जाचा पुरावा मानले जाते. तर तोंडीला दुय्यम महत्व असते. संघाकडे त्या काळातला एकही लेखी पुरावा नाही तर आम्ही आंबेडकरवादी ठोस, सबळ, लेखी आणि त्याकाळातल्या पुराव्यांच्या आधारे बोलत आहोत. शिवाय ठेंगडी आणि ऑर्गनायझर हे आर.एस.एस.चे असल्याने त्यांना फारशी विश्वासार्हता नाही. ते या घटनेचे लाभार्थी असल्याने त्यांचा नंतरच्या काळातला आणि तोही तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.

१२. ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा

ठेंगडीचे पुस्तक डॉ. आंबेडकर हयात असताना लिहिलेले नसून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कितीतरी वर्षांनी लिहिलेले आहे. समकालीन एकही लेखी दस्तावेज ठेंगडी, आनंद वा तुलींनी सादर केलेला नाही. त्यामुळे ही तोंडी माहिती कल्पित आणि नंतर रचलेली आहे. बनावट आणि सांगोवांगी असल्याने ती टिकू शकत नाही.

१३. बाबासाहेबांची संघशिबिराला भेट? नाही, हीसुद्धा थापच !

डॉ. आंबेडकरांच्या संघ शिबिराच्या भेटीची १९३९ ची कहाणीही अशीच कपोलकल्पित आहे, बनावट आहे. तिचे त्या काळातले लिखित पुरावे, फोटो, संघ व बाबासाहेब यांच्यातील भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे पुरावे संघ देऊ शकलेला नाही. ते दिल्याशिवाय त्यांच्या म्हणण्यावर चर्चासुद्धा शक्य नाही. विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

१४. बाबासाहेब आणि संघ, तत्वज्ञानात १८० डिग्रीचा फरक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला परमप्रिय असलेली मनुस्मृती जाळतात, संघ ज्या डोलार्‍यावर उभा आहे तो हिंदू धर्म ते सोडतात, हिंदुत्व सपशेल नाकारतात, बौद्ध धर्म स्वीकारताना आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ते लाखोंच्या जनसमुदायाला २२ प्रतिज्ञा देतात, त्यात हिंदूंच्या देवता राम, कृष्ण यांना मी मानणार नाही अशा प्रतिज्ञा आहेत.

आर.एस.एस.ने रामराज्याची कल्पना सोडून दिलेली आहे काय? "रिडल्स ऑफ हिंदुइझम," "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" "रेव्होल्युशन अ‍ॅण्ड काऊंटर रेव्होल्युशन" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे ग्रंथ आर.एस.एस.ला मान्य आणि प्रिय आहेत काय?

"अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुलभूत तत्वज्ञान आहे. तर आर.एस.एस.ला समरसता हवीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती नष्ट करा म्हणतात, तर जाती टिकवा आणि त्यांचातले भेद कमी करून समरसता निर्माण करा असे संघीय म्हणतात.

या दिशा संपूर्ण विरूद्ध

फॅसिस्ट संघाचा बाबासाहेबांच्या अपहरणाचा डाव-

थोडक्यात आर.एस.एस. आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीत काडीचेही साम्य नाही. डॉ. आंबेडकराना हायजॅक करण्यासाठी संघ हे प्रयत्न करीत आहे. डॉ. आंबेडकरांना आज सारे जग महान विद्वान, घटनाकार, जगभरच्या उपेक्षित वंचितांचा मसीहा म्हणून वंदन करते. तर संघ हा फॅसिस्ट म्हणून कुविख्यात आहे. म्हणून संघाला आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तसेच आंबेडकरांना मानणार्‍या व्होटबॅंकेला भुलवण्यासाठी ही पळवापळवी करायची आहे. आम्ही जागृत आंबेडकरवादी संघाला त्यात कदापिही यशस्वी होऊ देणार नाही!

Updated : 27 April 2020 7:06 AM GMT
Next Story
Share it
Top