Home > मॅक्स ब्लॉग्ज > ‘जात’ जात नाही...!

‘जात’ जात नाही...!

‘जात’ जात नाही...!
X

सुरज येंगडे यांनी लिहिलेलं "कास्ट मॅटर्स" सध्या चर्चेत आहे. सुरज येंगडे मुळचे मराठवाड्यातील नांदेडचे असून ते सध्या अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट रिसर्चर आहेत. आफ्रिकी विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. केलेली आहे. त्यांनी जिनीव्हा, लंडन, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणच्या नामांकीत संस्थां सोबत काम केलेलं आहे. "अ ग्लोबल जर्नल ऑफ सोशल एक्स्लुशन" मध्ये ते सहसंपादक आहेत. जगभरातील नामांकित प्रकाशन संस्था आणि मीडिया हाऊसेस ने त्यांचं लिखाण प्रकाशित केलेलं आहे.

"कास्ट मॅटर्स" अर्थात जात महत्त्वाची ठरते या पुस्तकात त्यांनी मुख्यतः जात कुठे कुठे आणि कशाप्रकारे प्रभाव पाडते यावर सखोल भाष्य केले आहे.

यातील "बीईंग अ दलित" पहिल्या प्रकरणात परस्पर मानवीसंबंध: उपरेपणा, अस्तित्व, मानवी जिव्हाळा आणि द्वेष जे जातीच्या विवादाभोवती गुरफटलेले आहेत यावर चिंतन केलं गेलं आहे. लेखक म्हणतो, "मला या जगात दुय्यम दर्जाचा म्हणून राहण्यास भाग पाडलं आहे, तर ब्राह्मण आणि त्यांचं सार्वभौमत्व प्रथम दर्जाचं आहे." लेखक आपल्या घरापासून, देशापासून खूप लांब यूकेमध्ये शिकत असताना ज्या भारतीय सहविद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचा, राहायचा, जेवायचा ते सहकारी मित्र, लेखक फेसबुकवर दलीत अत्याचारांच्या विरोधात लिहत असल्याचे कळाल्यानंतर कसे वैरी झाले, त्यांच्यातल्या अनेकांनी त्याला ब्लॉक केले, हे भांडण लेखकावर त्यांच्याकडून झुंडीने हल्ला करेपर्यंत पोहोचलं. ते विद्यार्थी मुख्यतः हिंदू-बनिया, सिंधी-सिख, ब्राह्मण आणि जैन समुदायातील होते. या बाबतीत लेखक म्हणतो "माझं, एका दलिताचं, असं ठाम मतप्रदर्शन ते सहन करु शकले नाहीत." हे अनुभव सांगताना लेखकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आत्मकथा "वेटींग फॉर व्हिसा" आठवते.

"निओ दलित राईसिंग" या प्रकरणात वर्तमान दलित चळवळींचा आढावा घेतला गेला आहे. तर "द मेनी शेड्स ऑफ दलित्स" या प्रकरणात दलितांमधील विविध प्रकारचे घटक त्यांच्या सामाजिक, आर्थिक,धार्मिक परिस्थितीच्या आधारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यमवर्गीय दलित

"द दलित मीडल क्लास" हे या पुस्तकातील महत्त्वाचं प्रकरण आहे. असा अनेकांचा आणि विशेषतः कम्युनिस्टांचा समज असतो की, मध्यमवर्गीय झाल्यावर किंवा आर्थिक प्रगती झाल्यावर जात संपते. लेखक विविध प्रमाण देऊन या समजाला खोटं सिद्ध करतो. मुळात दलितांत अजून म्हणावा तसा मध्यमवर्ग तयार झालेलाच नाही असे एन. एस. एस. ओ. च्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून लेखक म्हणतो.

अनेक दलित बॉस आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत कनिष्ठांनी भेदभाव बाळगल्याचं व्यक्त केलेलं आहे असे लेखक म्हणतो. तो याबाबत उदाहरण देतो की, एका वरिष्ठ पत्रकाराने मुंबईतील एका दलित उद्योजकाविषयी स्टोरी केली आहे की, त्याचा एक कर्मचारी एकाच जग मधून पाणी पिण्याच नाकारतो, आपली स्वतंत्र बॉटल आणतो. मालकाने कारण विचारल्यास नि:संकोच सांगतो की मला माझ्या जातीचे नियम पाळायचे आहेत आणि तू जे पाणी पितोस तेच पाणी मी पिऊ शकत नाही. शेवटी तो उद्योजक आपल्यामुळे इतर कोणाला गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःच आपली वेगळी बॉटल बाळगतो, त्या कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या आर्थिक स्त्रोतास तो जबाबदार असूनही. त्याला जातिव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे वागण्यास भाग पाडले जाते.

सफाईकार्य करणाऱ्या मनुष्याचे, वीटभट्टीवरील कामगाराचे, भूमिहीन शेतमजूराचे जातिविषयीचे अनुभव आणि ड्राइव्हर, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, सरकारी आधिकारी, इत्यादींपेक्षा भिन्न असू शकतात. पण या भिन्न अनुभवांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे जातीव्यवस्थेचा अंमल. ही आपल्यासारख्याच दुसऱ्या मनुष्याला कमी ठरवण्याची सर्वोच्च पद्धती आहे.

जातीव्यवस्थेची जबरदस्त पकड मध्यमवर्गात थोडी ढिली होते हे खरं आहे, त्याचं कारण स्थलांतर आहे. आपले जात निर्देशित करणारे नाव लपवून किंवा बदलवून ब्राह्मणासारखी नावं ठेवणाऱ्यांच्या बाबतीत लेखक म्हणतो, नावं काही काळा पुरतं दुष्ट जातीवादापासून वाचवू शकतात, समाजात चांगली वागणूक, हिंदू सणांमध्ये सहभाग, मंदिरांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. पण परत आपल्यागावी आल्यानंतर गावातील गावगाडा त्यांना मंदिरात, खाजगी कार्यक्षेत्रात समान स्थान देण्याचं नाकारतो.

या भागात लेखकाने दलितांमध्ये सरकारी नोकऱ्या व इतर माध्यमांतून जो काही 2-5% मध्यम वर्ग तयार झाला आहे त्याचा सखोल अभ्यास केला आहे. मध्यमवर्गीय नेतृत्व करत असलेल्या चळवळीचांही यात अभ्यास केला आहे. याचा एकंदरीत असा निष्कर्ष काढला आहे की दलितांमध्ये तयार झालेल्या मध्यमवर्गाची इतर दलितांच्या मुक्ती लढ्यासाठी काही मदत होत नाही. उलट ते या कनिष्ठ समूहावर ओझे असल्यासारखंच आहे.

भारतीय समाज, शासन, प्रशासन इत्यादींची दलितविरोधी वृत्ती कशाप्रकारे आहे हे लेखकांनी विविध समाजशास्त्रीय, आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे देऊन दर्शवली आहे.

विविध बजेटच्या तरतूद घोषित करताना कश्याप्रकारे दलित आणि आदिवासींच्या विरोधी वृत्ती दिसते हे लेखकाने विविध उदाहरणे, प्रमाण देऊन सांगितले आहे. 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं. या स्पर्धेसाठी दिल्ली सरकारच्या बजेटमधील अनुसूचित जातीच्या (SCSP) विकासासाठी असलेला निधी वर्ग करण्यात आला असल्याचे उदाहरण लेखक देतो.

"दलितांच सरसकटीकरण" हा मुद्दा लेखक पुढे उपस्थित करतो. तो म्हणतो, जर एक दलित अपयशी ठरला तर त्याच्या सगळ्या समाजाला लाजवलं जातं. परंतु एखाद्या ब्राह्मणाने एखादा गुन्हा केला तर त्याबाबत त्याची जात मधे न आणता त्याला एकट्यालाच दोषी म्हटलं जातं. किंवा जर ब्राह्मण अनुत्तीर्ण राहिला तर त्याला सन्मानजनक कामाच्या बाजारात सामावून घेण्यासाठी जुळवाजुळव केली जाते, त्यासाठी प्रसंगी भ्रष्टाचाराचा अवलंब केला जातो. ब्राह्मणी समाजात सोईस्करपणे वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे मापदंड लावले जातात.

"दलित मध्यम वर्गाची सत्तेविषयी वृत्ती" यात लेखक उदाहरण देतो की कांशीराम यांनी दलित स्वाभिमानाचं पर्यायी राजकारण उभं केलं होतं ते संपताना दिसत आहे. मायावती आपला भाऊ आनंद कुमार यास प्रमोट करत आहेत आणि इतर परिवारवादी पक्षांप्रमाणे बसपा ही होताना दिसत आहे. तसेच दलितांमधील स्वतःला उच्च व इतरांना कमी समजतो तो नव्याने कशाप्रकारे भेदभावाची बीज रोवत आहे. तो याची दक्षता घेत आहे की समाजाच्या खालच्या थरावर कशी सत्ता गाजवता येईल. हा वर्ग कसा दलित चळवळीला मारक आहे, हे लेखकाने मांडलं आहे.

दलित भांडवलवाद

"दलित कॅपिटलीझम" या प्रकरणात डिक्की व इतर संस्था व उद्योजकांचा सुरू असलेल्या दलित भांडवलवादाचा आढावा घेतला आहे. लेखक सुरुवातीला म्हणतो 1990 च्या नवउदारवादी धोरणानंतर पारंपारिक जात भांडवलशाहीला काहीसा ब्रेक मिळाला आणि डिक्कीला दलित उद्योजकांच्या निर्मितीसाठी जागा मिळाली. पुढे लेखक डिक्कीची तुलना अमेरिकेतील गोऱ्यांनी घोषित केलेल्या आणि मदत केलेल्या बुकर टी वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वातील आफ्रिकन अमेरिकन भांडवलवादाशी करतो.

भारतातील दलितांचा देशातील संपत्तीवर आणि उत्पादनांच्या साधनांवर ताबा नाही म्हणून जोपर्यंत तो ताबा मिळत नाही तोपर्यंत दलित भांडवलवाद उभा राहू शकत नाही. म्हणून प्रस्थापित भांडवली व्यवस्थेविरोधात दलिताने बंड पुकारू नये म्हणून ‘दलीत भांडवलवाद’ हे या प्रस्थापितांनी दलितांना भांडवलवादाचं दाखवलेलं प्रलोभन आहे.

दलित ही संकल्पना शोषणाच्या विरूद्ध आहे आणि भांडवलवाद शोषण सुरू ठेवणे निवडतो. म्हणून भांडवलवाद समता प्रस्थापित करण्यास पर्याप्त नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशनद्वारे सादर केलेला संविधानाचा ड्राफ्ट "स्टेटस अँड मायनॉरिटिज" मध्ये सांगितलेल्या समाजवादाचा विचार करण्याची गरज असल्याचं मत लेखक व्यक्त करतो. या प्रकरणात जात सरंजामशाहीतला भांडवलवाद, बनिया भांडवलशाही इत्यादी विषयांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाच्या शेवटी लेखक म्हणतो, भांडवलशाही ही औद्योगिक व्यवस्था भारतात, जातीव्यवस्था मुळात भिनलेल्या देशात सततच्या दुःखाकडे नेणारा मार्ग आहे.

ब्राह्मणवादाचा विरोधातील ब्राह्मण

"ब्राह्मण अगेंस्ट ब्राह्मणीजम" या शेवटच्या प्रकरणात जन्माने ब्राह्मण असलेल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात असलेल्यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी असलेल्या ब्राह्मणांचं वर्णन केलेलं आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्यासाठी पुढाकार घेतला, ती त्यांनी त्यांचे ब्राह्मण सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते जाळली हे उदाहरण लेखक देतो. जातीचे सर्वोच्च लाभार्थी असलेले ब्राह्मण आणि सर्वाधिक शोषित असलेले दलित यांनी एकत्र येऊन जात सोडावी असा संदेश लेखक सुजय यांना द्यायचा आहे.

- मुकुल निकाळजे

औरंगाबाद.

Updated : 25 July 2019 7:58 AM GMT
Next Story
Share it
Top