Home > मॅक्स ब्लॉग्ज > सआदत बेशक मर जाए... मंटो जिंदा रहे!

सआदत बेशक मर जाए... मंटो जिंदा रहे!

सआदत बेशक मर जाए... मंटो जिंदा रहे!
X

पाक टी हाऊस... लाहोरच्या मॉल रोडवर असलेलं एक नामांकित सामाजिक-सांस्कृतिक केंद्र. प्रस्थापितांविरुद्धचा उर्दू लेखक-कवी-शायर-चित्रकार-प्राध्यापक-वकिलांचा हा अड्डा. साठीनंतरच्या दशकात मुंबईत एकेकाळी ज्या इराणी हॉटेलने बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे आदी विद्रोही लेखकांसह चळवळीतले अनेक कार्यकर्ते, नेते, कॉम्रेड घडताना पाहिले, अगदी तसंच पाक टी हाऊसच्याबाबतीतही तंतोतंत घडत होतं. फाळणीनंतरच्या दशकात कवी इक्बाल, फैज अहमद फैज, सआदत हसन मंटो, नोबेल पुरस्कार विजते शास्त्रज्ञ अब्दुस सलाम यांच्यासह त्याकाळचे अनेक दिग्गज लेखक-कवींचा पाक टी हाऊसमध्ये वाद-विवाद रंगायचा.

...तर अशा या पाक टी हाऊसमध्ये कदाचित ज्या खुर्चीवर मंटो किंवा फैज बसला असावा, त्याच खुर्चीवर बसून मी माझ्या काही पाकिस्तानी पत्रकारबंधूंसोबत ‘चाय पे चर्चा’ करत बसलो होतो. २००४ सालची ही घटना... जवळपास महिनाभर मी पाकिस्तानात होतो आणि निमित्त होतं, भारतीय क्रिकेट संघाचा तब्बल दहा-बारा वर्षानंतरचा पाकिस्तान दौरा.

मंटो के घर जाना है, मुमकीन है?

माझ्या प्रश्नावर ‘डेली जंग’चा पत्रकार खलिलभाई जरासा चमकला.

‘अरे भाईजान, यहाँ पर हिंदुस्थान के जो जर्नलिस्ट आये है वो तो हमे पुछते है की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद का घर कहाँ है, और आप तो मंटो की खोज मे निकले हो... बिलकुल मुमकीन है’

खलिलचे उर्दू साहित्याचे वाचन दांडगे होते त्यामुळे आता चर्चेने मंटोची जागा घेतली होती.

यहीं पाक टी हाऊस मे मंटो साहब घंटो बैठा करते थै... कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानचे सचिव सज्जाद झहर ज्यांचा लेखक म्हणूनही उर्दू साहित्यात प्रचंड दबदबा आहे. त्यांनी फाळणीनंतर पाकिस्तानी प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची याच पाक टी हाऊसमध्ये स्थापना केली होती. फैज, इक्बाल, मंटो हे सगळे या संघटनेचे सदस्य होते. परंतु याच प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने अखेरच्या काळात मंटोला वाऱ्यावर सोडले होते... अर्थात मंटोचा स्वभावच त्याला कारणीभूत होता. फाटकं तोंड, प्रचंड चिडचिडेपणा, टीकाकारांच्या अंगावर धावून जाण्याचा विक्षिप्त स्वभाव, तुसडेपणा, दुसऱ्याची टर खेचण्याची सवय, अहंकार, उर्मटपणा यामुळेच कोणी मंटोला जवळ उभं करत नसे... मंटोचा एकटेपणाही त्यामुळे अधिकच वाढत गेला...

खलिलचा चेहरा उदास झालेला स्पष्ट दिसत होता...

‘लक्ष्मी मॅन्शन’... लाहोरच्या प्रसिद्ध मॉल रोडवर असलेली ही जुनाट इमारत मला शोधायची होती. पाकिस्तान असूनही इमारतीच्या नावात ‘लक्ष्मी’... (आणि विशेष म्हणजे हे नाव हटवण्यासाठी तिथल्या संस्कृतीरक्षकांनी राडा घातला नव्हता.) मंटोचं घर याच लक्ष्मी मॅॅन्शनमध्ये होतं. अशा लक्ष्मी निवासात जिथे फाळणीनंतर मंटो जेमतेम सात वर्ष राहिला आणि रक्ताच्या उलट्या करत करत मेला... अशा लक्ष्मी निवासात जिथे त्या इनमिन सात वर्षात लक्ष्मी त्याच्यावर कायम रुसलेलीच राहिली... अशा लक्ष्मी निवासात जिथे मंटोने जरी विपुल लिखाण केले असले तरी तो फक्त भणंग होऊन विस्कटलेले आयुष्यच तेवढे जगला... पाकिस्तानात परतण्याचा कदाचित मंटोलाही पश्चाताप होत असावा, कारण एका मित्राला पाठवलेल्या पत्रात मंटो म्हणतो, ’वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’.

मंटोने फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याऐवजी मायानगरी मुंबईतच राहायला हवे होते, कारण मंटोने कितीही विद्रोही लिखाण केले असते तरी उदारमतवादी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखणारा प्रागतिक विचारांचा नेहरूंचा काळ होता तो, असा एक मोठा मतप्रवाह मंटोच्याबाबतीत त्यावेळी आपल्याकडे होता. मुंबईच्या सिनेजगतात कथा-पटकथा लेखक म्हणून आणि काही फिल्मी साप्ताहिकात स्तंभलेखक म्हणून मंटोने बऱ्यापैकी नाव आणि पैसे मिळवायला सुरूवात केली होती. ‘मुसव्विर’ नावाच्या एका फिल्मी साप्ताहिकात मंटोच्या ‘बाल की खाल’ या सदरासाठी वाचक वेडे असायचे. सिनेमा जगतातील अनेक बड्या हस्तींचे मंटोने आपल्या स्तंभातून अक्षरश: वाभाडे काढले होते. फाळणीनंतर अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, फायनान्सर भारतात परतले. परिणाम असा झाला की भारतीय सिनेमाची भरभराट व्हायला लागली तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सिनेमा डबघाईला येऊ लागला. मंटोच्या त्यावेळच्या अनेक मित्रांनी ज्यात अगदी अशोक कुमारपासून के. आसिफ सारख्यांचा समावेश होता, सगळ्यांनी मंटोला पाकिस्तानात जाण्यापासून रोखायचा प्रयत्न केला. परंतु असे असले तरी फाळणीने अस्वस्थ झालेल्या मंटोचे कुटुंब लगेचच मायदेशी परतले होते. बॉम्बे टॉकिजमध्ये नोकरीला असताना मंटोच्यानावे जीवे मारण्याची निनावी पत्रे यायला लागली होती. याच कश्मकशमध्ये मंटो लाहोरला आपल्या मायदेशी निघून गेला आणि ज्या उदारमतवादी नेहरूंबद्दल गौरवोद्गार काढले जात होते त्याच नेहरूंनी अवघ्या काही महिन्यातच मजरूह सुलतानपुरी या महान गीतकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत तुरुंगात डांबले. कॉमनवेल्थमध्ये भारताने कशासाठी सहभागी व्हायचे, यावर मजरुह सुलतानपुरी यांनी एक कविता लिहिली होती ज्यामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. मंटोचे विचार तर अधिक बंडखोर होते. तो म्हणायचा,

‘लीडरों और दवाफरोशों को मै एक ही जुमरेमें शामिल करता हुं. लीडरी हो या दवाफरोशी दोनो पेशे है, औऱ अगर सियासतसे मुझे कोई दिलचस्पी है तो सिर्फ उतनी जितनी महात्मा गांधीजीको सिनेमासे होगी. वह सिनेमा नही देखते और मै अखबार नही पढता.. असल में हम दोनो गलती करते है. उन्हे फिल्म जरुर देखनी चाहिये और मुझे अखबार जरूर पढना चाहिये...

लाल विटांच्या भिंतीवर लँम्पशेडखालचा निळ्या रंगाचा नामफलक आणि त्यावर इंग्रजी आणि उर्दू अशा दोन्ही भाषेत लिहिलं होतं...

सआदत हसन मंटो...शॉर्ट स्टोरी रायटर(१९१२-१९५५)

कधीतरी वाचनात आलं होतं, मंटो म्हणायचा,

‘लोग मुझे पुछते है की मै कहानी क्यों लिखता हूँ... मै कहता हूँ, शराब की तरह कहानी लिखने की भी लत पड गई है. मै कहानी न लिखू, तो मुझे ऐसा लगता है की मैने कपडे नही पहने है या गुसल नही किया है या शराब नही पी है. दरअसल मै कहानी नही लिखता हूँ, बल्कि कहानी मुझे लिखती है. मै बहुत कम पढा आदमी हूँ, वैसे मैने दो दर्जन किताबें लिखी है और जिस पर आए दिन मुकदमे चलते रहते है, जब कलम मेरे हाथ में ना हो तो मै सिर्फ सआदत हसन होता हूँ’

मंटोच्या घरची बेल वाजवताना त्या क्षणी मलाही मंटो नव्हे तर फक्त सआदत हसन जाणून घ्यायचा होता आणि मंटोच्या सर्वात थोरल्या मुलीकडून निगात खानकडून जी सध्या मंटोच्या या घरात राहते तिच्याकडून मी तिच अपेक्षा ठेवली होती... कलम हाथ में ना हो तो सआदत हसन क्या चीज है...?

साफिया यानि मेरी अम्मी से बेशुमार इश्क करते थे अब्बाजान.. अब्बा नेहमी साफियाला म्हणायचे की मी इतकं सार लिहून ठेवेन की तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही. अब्बांनी लिहिलं खुप परंतु अम्मीला पैशाचं तोंड कधीच पाहायला मिळालं नाही. रॉयल्टीवरून अनेक प्रकाशकांनी आम्हाला व्यवस्थित चुना लावला... निगातच्या बोलण्यात खूप कडवटपणा जाणवत होता.

साफिया आणि मंटोच्या अनेक आठवणींना निगातने उजाळा दिला.

‘तो फोटो दिसतोय’, टेबलवर ठेवलेल्या एका फोटोफ्रेमकडे पाहात निगात म्हणाली, अब्बांनीच काढलाय तो अम्मीचा फोटो. पोझ कशी द्यायची असते, हे अब्बांनी आमच्या अतिशय साध्याभोळ्या अम्मीला शिकवले, फोटो काढण्यापूर्वी स्वत: अम्मीच्या साडीला इस्त्री करून दिली, तिचे केस बांधले आणि असा स्टायलिश फोटो काढला. अब्बा घरी असताना ही कामं अगदी सहजपणे करायचे. स्वत: कधीकधी जेवण बनवायचे. पकोडा ही त्यांची आवडती रेसिपी होती. मला फार काही आठवत नाही .कारण मी त्यावेळी जेमतेम दहा-बारा वर्षांची तर नुझ्झत आणि नुसरत या माझ्या बहिणी तर आणखीनच लहान होत्या. पण पलंगावर झोपून आम्हाला कधी पोटावर तर कधी गुडघ्यांवर बसवून झोके देणारे अब्बाजान मात्र मला आजही आठवतात. माझ्या अगोदर आरिफ जन्मला होता परंतु कुठल्यातरी आजाराने तो अगदी कोवळ्या वयातच गेला. त्यावेळी आम्ही दिल्लीला राहायचो. अब्बाजान खूपच अस्वस्थ झाले होते, त्या घटनेने असे अम्मी आम्हाला सांगायची. ‘खालिद मियाँ’ ही अब्बांची एक कथा आरिफवरच असल्याचे अम्मी सांगते.

‘’मुझसे पूछा जाता है कि मैं कहानी कैसे लिखता हूँ। इसके जवाब में मैं कहूँगा कि अपने कमरे में सोफे पर बैठ जाता हूँ, कागज-कलम लेता हूँ और 'बिस्मिल्ला' कहकर कहानी शुरू कर देता हूँ। मेरी तीनों बेटियाँ शोर मचा रही होती हैं। मैं उन से बातें भी करता हूँ। उनके लड़ाई-झगड़े का फैसला भी करता हूँ। कोई मिलने वाला आ जाए तो उसकी खातिरदारी भी करता हूँ, पर कहानी भी लिखता रहता हूँ। सच पूछिए तो मैं वैसे ही कहानी लिखता हूँ, जैसे खाना खाता हूँ, नहाता हूँ, सिगरेट पिता हूँ और झक मारता हूँ |

कहानी मेरे दिमाग में नहीं, मेरी जेब में होती है, जिसकी मुझे कोई खबर नहीं होती। मैं अपने दिमाग पर जोर देता हूँ कि कोई कहानी निकल आए। कहानी लिखने की बहुत कोशिश करता हूँ, पर कहानी दिमाग से बाहर नहीं निकलती। आखिर थक-हारकर बाँझ औरत की तरह लेट जाता हूँ। जब कहानी नहीं ही लिखी जाती, तो कमी यह होता है कि मेरी बीवी मुझसे कहती है, 'आप सोचिए नहीं, कलम उठाइए और लिखना शुरू कर दीजिए!' मैं उसके कहने पर लिखना शुरू कर देता हूँ। उस समय दिमाग बिल्कुल खाली होता है, पर जेब भरी हुई होती है। तब अपने आप ही कोई कहानी उछलकर बाहर आ जाती है। उस नुक्ते से मैं खुद को कहानीकार नहीं, बल्कि जेबकतरा समझता हूँ जो अपनी जेब खुद काटता है और लोगों के हवाले कर देता है।

निगातशी मी बोलतोय खरा परंतु मेंदूने मंटोचा पूर्णपणे ताबा घेतलाय. कुठाय तो सोफा, तो पलंग... ती खुर्ची कुठेय ज्यावर उकीडवे बसून मंटो झर झर लिहायचा... माझी नजर सबंध घरभर भिरभिरत होती. बुकशेल्फमध्ये मंटोची जवळपास सगळी पुस्तके नीट रचून ठेवली होती, परंतु त्या पुस्तकांमधली सकिना, टोबा टेक सिंह, खालिद मियाँ, घाटन लडकी ही सारी पात्रे आणि मंटोच्या लिखाणात वारंवार येत राहणारा बैचेन सूर मला त्यावेळी प्रचंड अस्वस्थ करत होता....

''घरी प्रचंड आबाळ सुरू होती. दारूच्या पूर्ण आहारी गेलेल्या अब्बाजानवर अश्लील आणि बीभत्स कथाकार म्हणून पाकिस्तानी सरकारने खटले सुरू केले होते. मानधन तर लांबची गोष्ट राहिली आता तर ते फक्त दारुच्या एका बाटलीसाठी कोणत्याही प्रकाशकाला आणि संपादकांना कथा लिहून द्यायला लागले होते. बरं अब्बांचा कलेशी प्रामाणिकपणाही इतका अस्सल की काहीही झाले तरी ते त्यांच्या चाहत्यांकडून कधीही दारूसाठी पैसे घेत नसत. अशातच मला टायफॉइड झाला. उपचारासाठी उसने पैसे घेऊन येतो असे म्हणत अब्बाजान घरी परतले, ते औषधाऐवजी दारुच्या बाटलीसह.. जे पैसे उसनवारीने आणले होते तेच पैसे अब्बांनी दारुसाठी खर्च केले होते. त्याचा त्याना प्रचंड पश्चाताप झालेला जाणवत होता. अपराधी चेहऱ्याने ते माझ्या पलंगावर तासनतास बसून राहायचे. अम्मी त्यांना पलंगावरून खाली ढकलायची परंतु पुन्हा पुन्हा ते माझ्याजवळ येऊन बसायचे... निगातच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या...

मंटोच्या घरी जाऊन आल्याचा, एक चांगली स्टोरी तयार होईल हा तिथे जाण्यापूर्वीचा उत्साह आता पूर्णपणे मावळला होता. एका बैचेन अवस्थेतच लक्ष्मी मॅन्शन मी सोडलं होतं. वाचनाची जबरदस्त आवड असणारा मंटो, वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून उंची सिगारेटी ओढणारा मंटो, तरुण वयात शिक्षणावरुन लक्ष उडाल्याने बेछूटपणे जगत राहाणारा मंटो, स्वातंत्र्यपूर्व काळात कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघणारा तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसणारा मंटो, तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनं करणारा मंटो आणि एकदा लेखन हेच आपलं खरं काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा तुफानी वेगानं नाटकं, निबंध, व्यक्तिचित्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा लिहिणारा मंटो एकीकडे तर दुसऱ्याबाजूला नवरा आणि बाप म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेला सआदन हसन ही व्यक्ती एकीकडे...

पाकिस्तानला जाऊन आता मला १४ वर्षे झाली होती. मधल्या काळात मंटोची थोरली कन्या निगात खान भारतातही येऊन गेली होती. मंटोच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमासाठी निगातला विशेष आमंत्रित केले होते आणि त्याच दरम्यान मला एक धक्कादायक बातमी कळाली...

सात वर्षे, आठ महिने आणि नऊ दिवस... मंटोचे वास्तव्य असलेलं ‘लक्ष्मी मेन्शन’ पाडण्यात आलंय...

लक्ष्मी निवासाची जुनी इमारत पाडून त्याजागी कमर्शियल मॉल आणि पॉश इमारती उभ्या राहिल्या आहेत. जरा अधिक आढावा घेतला आणि जे समजलं ते मंटोच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होतं... मंटोचं घर वाचविण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी जीवाचा आटापिटा केला खरा परंतु पोकळ आश्वासनं, लाल फितीत अडकलेल्या फायली आणि पाकिस्तानी सरकारचे मंटोवर असलेले ‘विशेष’ प्रेम... निगातच्या डोळ्यादेखत एकेक वीट पाडली गेली.

संस्कृतीच्या ठेकेदारांनी आणि पाकिस्तानी सरकारने एकेकाळी मंटोला सळो की पळो करून सोडलं होतं. त्याबद्दल मंटोने त्याच्या टीकाकारांबद्दल फार मजेशीर लिहून ठेवलंय. तो म्हणतो,

“ओ उपरवाले इसे इस दुनिया से उठा लो, ये इस दुनिया के लायक नहीं है। ये तुम्हारी खुशबू को नकार चुका है। जब उजाला सामने होता है तो ये चेहरा फेर कर अँधेरे कोनों की तलाश में चला जाता है। इसे मिठास नहीं कड़वाहट में स्वाद मिलता है। ये गंदगी से सरोबार है। जब हम रोते हैं तो ये खुशियां मनाता है, जब हम खुश होते हैं तो ये मातम करता है। हे ईश्वर ये तुम्हे भुलाकर शैतान की इबादत करता है”...

अशा या मंटोचे राष्ट्रीय स्मारक होणे तरी शक्य आहे का? मंटोच्या निधनानंतर तब्बल ५० वर्षांनी मंटोला पहिल्यांदाच मरणोत्तर ‘सितारा-ए-इम्तियाज़’ पुरस्कार देणाऱ्या पाकिस्तानी सरकारला खऱं तर तसे करणं अगदी सहज शक्य होतं.

लक्ष्मी मॅन्शनमध्ये आता राहणारी घरं फारच कमी राहिली होती. बिल्डरांचा त्या मोक्याच्या जागेवर डोळा होताच. मंटो तर फक्त सातच वर्ष इथे राहिलाय, असे वारंवार सांगत त्या जागेचा भाव कमी करण्याचा बिल्डरांचा डाव होता. सुरुवातीला मंटोच्या या घराच्या जागी स्मारक करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला होता. ज्यात पाकिस्तानच्या सांस्कृतिक मंत्री आणि फैज अहमद फैज यांची कन्या सलिमा हाश्मीचा समावेश होता. "लक्ष्मी मॅन्शन' पाडू नये, यासाठी कोर्टातून स्टे ऑर्डरदेखील मिळवली होती. मंटोच्या घराचे सांस्कृतिक जतन व्हावे, पाक टी हाऊसप्रमाणेच इथेही साहित्याची देवाण-घेवाण व्हावी, मंटोच्या जगभरातल्या चाहत्यांनी या स्मारकाला भेट द्यावी, असे या स्मारकाचे स्वरूप होते. परंतु मंटोच्या स्मारकाची फाईल जी काही दाबली गेली, ती पुन्हा कधीच वर आली नाही.

१८ जानेवारी १९५५... इतर बातम्यांच्या जोडीला पाकिस्तानच्या रेडियोवर आणखी एक बातमी सांगितली गेली, हार्ट फेल झाल्यामुळे मंटोचे निधन झाले...

हिंदी आणि उर्दुचे ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण कृशन चंदर यांनी मंटोच्या मृत्यनंतर लगेचच लिहिलेल्या काही ओळी त्यांच्याच शब्दात इथे आवर्जून नमूद करावश्या वाटतात...

मेरी आँख में आंसू का एक कतरा भी नहीं है, मंटो को रुलाने से अत्यन्त घृणा थी। आज मैं उसकी याद में आंसू बहाकर उसे परेशान नहीं करूँगा। आहिस्ते से अपना कोट पहन लेता हूँ और घर से बाहर निकल जाता हूँ।

सब जगह उसी तरह काम हो रहा है। आल इंडिया रेडियो भी खुला है और होटल का बार भी और उर्दू बाजार भी; क्योंकि मंटो एक बहुत मामूली आदमी था। वह एक गरीब कहानीकार था, वह कोई मंत्री नहीं था जो उसकी शान में झंडे झुका दिए जाते। आल इंडिया रेडियो भी खुला है; जिसने कि सैकड़ों बार उसकी कहानियों के ध्वनि नाट्य रूपांतरण किये हैं, उर्दू बाजार भी खुला है, जिसने उसकी हजारों किताबें बेचीं हैं और आज भी बेच रहे हैं। दिल्ली में मिर्जा गालिब की फिल्म चल रही है, इस फिल्म की कहानी इसी दिल्ली के मोरी गेट में बैठ कर मंटो ने लिखी थी... आज मैं उन लोगों कहकहा लगाकर देख रहा हूँ, जिन्होंने मंटो से हजारों रुपये की शराब पी है...

लोगों ने गोर्की के लिए अजायब घर बनाये, मूर्तियाँ बनाईं, शहर बनाये और हमने मंटो पर मुक़दमे चलाये, उसे भूखा मारा, उसे पागल खाने पहुँचाया, उसे अस्पतालों में सड़ाया और यहाँ तक मजबूर कर दिया कि वह किसी इंसान को नहीं शराब की बोतल को अपना दोस्त समझने को मजबूर हो जाये। हम इंसानों के नहीं मकबरों के पुजारी हैं। मंटो दुबारा पैदा नहीं होगा यह मैं भी जानता हूँ पर मंटो खुद कहता है, ऐसा होना मुमकिन है कि सआदत हसन मर जाये और मंटो जिंदा रहे

https://youtu.be/qUuLLw3nPYo

- प्रशांत पवार

Updated : 18 Jan 2019 6:51 AM GMT
Next Story
Share it
Top