Home > मॅक्स ब्लॉग्ज > पुढील 25 वर्षांतील पालक आणि मुलांची बदलती नाती

पुढील 25 वर्षांतील पालक आणि मुलांची बदलती नाती

पुढील 25 वर्षांतील पालक आणि मुलांची बदलती नाती
X

काही गोष्टी कालातीत असतात आणि त्या कधीच बदलत नसतात. निसर्गाने आपल्यामध्ये निर्माण केलेल्या अनेक प्रेरणा या गटात येतात. भूक, थकवा, पुनरूत्पादन, बाल संगोपन अर्थात पालकत्व आणि मृत्यु या निसर्गाने दिलेल्या देणग्या आहेत आणि सर्व प्राणी त्याने बाधलेले आहेत. मानवी संस्कृतीसुद्धा या गरजांमध्येच फुलण्याचा प्रयत्न करत असते.

प्रस्तुत लेखात यापैकी पालकत्व या देणगीचा आपण विचार करणार आहोत. आधुनिक समाजात पुढील 25 वर्षांत हे नाते बदलेल. का, कसं याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. भविष्याचा विचार करताना आपल्याला "लिंडी इफेक्ट्स" ची माहिती हवी. मँडेलब्रॉट नावाच्या गणितज्ञाने असे म्हटले आहे की, एखाद्या गोष्टीचे पूर्वायुष्य हे त्याच्या भवितव्याची मर्यादा ठरवते. उदा. जे पुस्तक गेली 100 वाचले चात आहे ते यापुढेही कित्येक वर्षे वाचले जाईल. पण जे गेले वर्षभर वाचले जाते आहे, ते पुढील एक वर्षानंतर शिल्लक राहण्याची शक्यता फारच कमी आहे. शारिरीक संकल्पनांना हा नियम फारच चपरवलपणे बसतो. पालकत्व ही या पाच गटात बसणारी संकल्पना आहे. त्यावर आपण पालकत्वाची चिकित्सा करूया...

पालक व मुलांच्या नात्यात कोणत्या गोष्टी आहेत

  1. एकमेंकावर अवलंबून असणे -

आयुष्याची जवळजवळ पहिली तीस वर्षे मुले पालकांवर विविध प्रकारे अवलंबून असतात. मुलं जितकी लहान तितकं अवलंबित्व जास्त. मूल लहान असताना पालकाचा मृत्यु झाल्यास त्या मुलाच्या वाढीवर, मानसिकतेवर आणि आयुर्मर्यादेवरदेखील घातक परिणाम होतो. तसे शास्त्राने नोंदले आहे.

उतारवयामध्ये या अबलंबित्वाची परतफेड होते. शेवटची तीस वर्षे पालक मुलांवर अवलंबून रहायला सुरुवात होते आणि त्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत जाते.

  1. सुरक्षितता –

हा मुद्दा वरील मुद्द्याचा भाग असला तरी, तो वेगळा बांधवा लागतो. कारण मुलांची विविध प्रकारची सुरक्षितता ही पालकत्वातही सर्वात बोजड जबाबदारी आहे. यात गडबड झाल्यास पालक स्वतःला जन्मभर अपयशी समजतात.

  1. अनुभव आणि सल्ला मसलत –

आपली आयुष्याबद्दलची मते आणि अनुभव वापरून मुलांच्या आयुष्याला मदत आणि दिशा देण्याचा प्रयत्न करणे तसेच अवघड प्रसंगी सल्ला देणे हा पालक असण्याचा महत्वाचा भाग आहे. जे पालक अशाप्रकारे कठीण प्रसंगात उपयोगी पडतात ते मुलांच्या दृष्टीने आदरणीय होतात.

  1. शिस्त –

स्वतःवर काही बंधने घालून घेणे आणि मनात येणाऱ्य विविघ उमाल्यांचे सुयोग्य नियोजन करणे हे मुलांना शिकवण्याची गरज असते. मुलांच्या वयानुसार यातले नियम बदलत जातात आणि ते तारतम्य वापरून करायचे काम आहे. शाळा आणि समाजही यात सहभागी होतात. पण प्राथमिक जबाबदारी ही पालकांची असते.

  1. प्रेम आणि आपुलकी –

जन्मभर पुरणारी आणि पुढच्या सर्व नात्यांचा रंग आणि पोत ठरणारी ही शिदोरी पालक-मुलं या नात्यामध्ये जन्मते. कोणत्याही स्व-निर्मित कारणाशिवाय कोणीतरी माझ्यावर प्रेम करत आहे. माझ्यासाठी कष्ट घेत आहे, म्हणजे मी सुद्धा लायक व्यक्ती आहे, हा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. आई-मुलं या नात्याने त्याची सुरूवात होत असली तरीही बाबा त्यात लवकरच सहभागी होतात आणि महत्वाचा घटक बनतात.

प्रत्येक नात्यामध्ये काही मध्यवर्ती भावना असतात. या नात्याचा पूर्ण प्रवास हा भावनांवर आधारित असतो. पालकत्वाची मध्यवर्ती भावना ही जबाबदारी आहे आणि ती सुसह्य व्हावी म्हणून म्हणून निसर्गाने आपुलकी प्रेम, कौतुक इत्यादी सहयोगी भावनाही निर्माण केल्या..

मुलं असण्याची मध्यवर्ती भावना ही विश्वास आहे आणि आदर, प्रेम, हक्क या सहयोग भावना त्या विश्वासाला जिवंत रहायला मदत करतात.

या पार्श्वभूमीवर आपल्याला आता भविष्याकडे बघायला हरकत नाही. सध्या दिसणारे आणि भविष्यात वाढत जाणारे बदल म्हणजे पालक आणि मुलांचा एकमेकांच्यासहवासात जाणारा वेळ कमी होतो आहे. मुलांच्या आयुष्यात अधिकाधिक लवकर इतर व्यक्ती प्रवेश करत आहेत आणि मुलांच्या आयुष्यावर अधिकार गाजवत आहेत. क्रमश:

डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचार तज्ञ

पुणे.

Updated : 23 March 2017 6:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top