Home > Max Political > विरोधी पक्षांच्या टीकेवर सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विरोधी पक्षांच्या टीकेवर सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विरोधी पक्षांच्या टीकेवर सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
X

कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. आपण प्रसंगी टीका करीत असाल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणे असा असतो. अशी प्रतिक्रिया सर्व पक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी कोरोना च्या लढाई संदर्भात सर्व पक्षीय बोलावली होती.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील नेते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा मिटींगमध्ये सहभागी झाले होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सरकारच्या वतीनं मिटींगला हजर होते. तर विरोधी पक्षातून भाजप च्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापच्या वतीनं आमदार जयंत पाटीलही मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू असा विश्वास व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता. आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले.

यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत. असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज कोरोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सुचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवत असतो.

केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण प्रसंगी टीका करीत असाल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणे असा असतो.

आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही. मात्र, मे अखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्ण संख्या वाढते आहे. मात्र, बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.

व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकांनाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय संस्था, लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्स मध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.

Updated : 7 May 2020 12:32 PM GMT
Next Story
Share it
Top